Thursday, April 15, 2010

रिलॅक्‍सेशनसाठी काही टिप्स
संगणकावर काम करण्याची गरज आज प्रत्येकालाच आहे. आधुनिकतेशी संबंध जोडण्यासाठी दैनंदिन व्यवहारात त्याची आवश्‍यकता असते. मात्र, सततच्या संगणकाच्या वापरापासून होणारे धोके टाळण्यासाठी प्रत्येकाने काळजी घेणेही आवश्‍यक आहे. संगणकाच्या मॉनिटरमधून विशिष्ट प्रकारचे किरण बाहेर पडत असतात, त्याकडे सतत पाहिल्याने डोळ्यांना त्रास होतो. मात्र कामाच्या ओघात संगणकाचे काम काही क्षण बाजूला ठेवण्याचे भान राहत नाही. त्याचा डोळ्यांवर विपरीत परिणाम होऊ शकतो. यासाठी, संगणकावर सलग काम करायचे असेल, तर दर पंधरा मिनिटांनी मॉनिटरवरून नजर हटविणे आवश्‍यक आहे. काही काळ डोळे बंद ठेवून डोळ्यांना आराम द्यावा. थंड पाण्याचा हलका शिडकावाही दिवसभराच्या ताणातून मुक्ती देऊ शकतो. मॉनिटरचा प्रकाशही डोळ्यांना कमीत कमी त्रास होईल, अशा रीतीने करून घेणे चांगले. फक्त संगणकावर काम करण्यासाठीचे खास चष्मेही मिळतात, त्यांचाही वापर करता येईल. डॉक्‍टरांच्या सल्ल्याने अशा गोष्टी केल्यास डोळ्यांचे आरोग्य चांगले राहून ताणमुक्तीला मदत होईल आणि रोजच्या कामातला उत्साहदेखील वाढेल.संगीत ऐका मस्तरिलॅक्‍स व्हायचं असेल तर संगीत ऐकण्यासारखा छान उपाय नाही. हे संगीत टीव्हीवर पाहण्यापेक्षा ते ऐकतऐकत काम करणं जास्त रिलॅक्‍स करतं. त्यामुळे तुमच्या घरच्या रेडिओवरची किंवा म्युझिक प्लेअरवरची धूळ झटका आणि या संगीत-उपचारांची मजा घ्या. संगीत मनावरचा ताण हलका करतंच; पण आपलं आवडतं गाणं, आवडतं वाद्यसंगीत ऐकलं, की काम करण्याचा उत्साह वाढतो. अर्थात संगीत ऐकताना काही गोष्टी पाळल्या पाहिजेत. सकाळी, दुपारी आणि रात्री त्या त्या प्रहराचा मूड ओळखून तशा प्रकारचं संगीत ऐका. रात्री झोपण्यापूर्वी ढॅणढॅण संगीत ऐकलं, तर झोप उडून जाईल, त्यामुळे त्या वेळी शांतच संगीत ऐकलं पाहिजे आणि सकाळी आवरतानाच्या वेळी मस्त उडत्या चालीची गाणी ऐका, म्हणजे कामं भराभर उरकतील आणि उत्साह वाटेल. संगीत ऐकताना त्याचा आवाज फार मोठा ठेवू नका, ते ऐकताना एकाच प्रकारचं संगीत ऐकण्यापेक्षा त्यात वैविध्य आणा, म्हणजे कंटाळा येणार नाही. ऑफिसमध्ये काम करतानाही बारीक आवाजात संगीत ऐकलं, तरी काम करताना फ्रेश वाटेल. टीव्ही बघण्यापेक्षा संगीत ऐकणं केव्हाही चांगलंच.

Sunday, April 4, 2010

बांधिलकी मानणारी लावणीसम्राज्ञी
संजय शिंदे
यमुनाबाई वाईकर यांनी नव्वदी पार केली असली तरी कलेसाठी आजवर व्यतीत केलेल्या आयुष्याचा सारा पट लख्खपणे त्यांच्या डोळ्यापुढे आहे. शरीर थकले तरी आवाजातील ठसका कायम. त्यामुळेच आजही लावणीचा विषय निघाला की त्या भरभरुन बोलतात. त्यांना नुकताच निळू फुले सन्मान पुरस्कार जाहीर झाला. त्यानिमित्ताने त्यांची भेट घेतली, तेव्हाही याचा प्रत्यय आला. ""निळूभाऊंचे माझे स्नेहाचे नाते होते. वाईत आल्यावर ते आवर्जून मला भेटायला येत होते. त्यांच्या नावाचा पुरस्कार मला महत्त्वाचा वाटतो,'' अशी भावना त्यांनी व्यक्त केली. वर्षानुवर्षे उपेक्षित राहिलेल्या कोल्हाटी- डोंबारी समाजात जन्मलेल्या यमुनाबाईंना परिस्थितीमुळे तमाशाकडे वळावे लागले; मात्र, गरिबीशी झगडत त्यांनी मोठ्या जिद्दीने आपले कर्तृत्व घडविले. सौंदर्य, अदाकारी व सुरेल आवाजाच्या देणगीमुळे त्यांनी मराठी लावणीच्या इतिहासात आपल्या कर्तृत्वाचा झेंडा सातासमुद्रापार फडकावला आहे. बालघाटी, छक्कड, चौकाची लावणी असे प्रकार त्या सादर करीत. बैठकीच्या लावणीला त्यांनी मोठा लौकिक मिळवून दिला. चौकाची लावणी ही त्यांची खासीयत होती. "का हो डोळे घालता सख्या', "सोडा मनगट हात तुटेल' अशा त्यांच्या लावण्या आजही रसिकांच्या ओठावर आहेत. यमुनाबाईंनी आयुष्यभर लावणी जिवंत ठेवली. पोटासाठी त्यांनी हा व्यवसाय स्वीकारला असला तरी या क्षेत्रात त्यांनी मोठे नाव कमवूनही त्यांच्या वागण्या-बोलण्यात त्याचा अजिबात लवलेशही जाणवत नाही. त्यांचे आपुलकीने बोलणे व वागण्यातील कमालीचा साधेपणा जाणवल्याशिवाय राहत नाही. यमुनाबाईंच्या तमाशा व लावणी क्षेत्रातील दखल घेऊन राज्य सरकारने त्यांना लावणीसम्राज्ञी पुरस्काराने सन्मानित केले. 1994 मध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले. तसेच महाराष्ट्र गौरव पुरस्कार, अखिल भारतीय जागतिक परिषद पुरस्कार आदी विविध पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. त्यांच्या लावण्यांवर अभ्यास करून अमेरिकेतील एका विद्यार्थिनीने डॉक्‍टरेट मिळविली आहे. तसेच लावणीवर तयार झालेला ग्रंथ कॅलिफोर्निया विद्यापीठात अभ्यासासाठी ठेवण्यात आला आहे. हा त्यांच्या कलेला मिळालेला मानाचा मुजरा आहे. कलाकार म्हणून त्यांचे वेगळेपण आहेच. मात्र, सामाजिक बांधिलकी जपण्यातही त्या मागे नाहीत. वाईत कोल्हाटी समाजासाठी घरे बांधण्यासाठी पुढाकार घेऊन त्यांची भटकंती थांबवली. त्याचप्रमाणे अखिल महाराष्ट्र कोल्हाटी समाज संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा घेऊन समाज व्यसनमुक्त होऊन शिक्षणाकडे वळावा, यासाठी मोठी धडपड केली. त्यांच्या या धडपडीला आता यश मिळू लागले आहे.महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीने नुकत्याच मुंबईत झालेल्या कार्यक्रमात त्यांना मानपत्र व गौरववृत्ती देण्यात आली. वयाच्या नव्वदीतही या कार्यक्रमास त्या उपस्थित राहिल्या होत्या. आता दगदग सहन होत नाही, अशी भावना त्यांच्या बोलण्यातून जाणवते. रसिकांनी भरभरून दिलेल्या प्रेमाबद्दलची कृतज्ञता त्यांच्या डोळ्यातून ओसंडून वाहते.