बांधिलकी मानणारी लावणीसम्राज्ञी
संजय शिंदे
यमुनाबाई वाईकर यांनी नव्वदी पार केली असली तरी कलेसाठी आजवर व्यतीत केलेल्या आयुष्याचा सारा पट लख्खपणे त्यांच्या डोळ्यापुढे आहे. शरीर थकले तरी आवाजातील ठसका कायम. त्यामुळेच आजही लावणीचा विषय निघाला की त्या भरभरुन बोलतात. त्यांना नुकताच निळू फुले सन्मान पुरस्कार जाहीर झाला. त्यानिमित्ताने त्यांची भेट घेतली, तेव्हाही याचा प्रत्यय आला. ""निळूभाऊंचे माझे स्नेहाचे नाते होते. वाईत आल्यावर ते आवर्जून मला भेटायला येत होते. त्यांच्या नावाचा पुरस्कार मला महत्त्वाचा वाटतो,'' अशी भावना त्यांनी व्यक्त केली. वर्षानुवर्षे उपेक्षित राहिलेल्या कोल्हाटी- डोंबारी समाजात जन्मलेल्या यमुनाबाईंना परिस्थितीमुळे तमाशाकडे वळावे लागले; मात्र, गरिबीशी झगडत त्यांनी मोठ्या जिद्दीने आपले कर्तृत्व घडविले. सौंदर्य, अदाकारी व सुरेल आवाजाच्या देणगीमुळे त्यांनी मराठी लावणीच्या इतिहासात आपल्या कर्तृत्वाचा झेंडा सातासमुद्रापार फडकावला आहे. बालघाटी, छक्कड, चौकाची लावणी असे प्रकार त्या सादर करीत. बैठकीच्या लावणीला त्यांनी मोठा लौकिक मिळवून दिला. चौकाची लावणी ही त्यांची खासीयत होती. "का हो डोळे घालता सख्या', "सोडा मनगट हात तुटेल' अशा त्यांच्या लावण्या आजही रसिकांच्या ओठावर आहेत. यमुनाबाईंनी आयुष्यभर लावणी जिवंत ठेवली. पोटासाठी त्यांनी हा व्यवसाय स्वीकारला असला तरी या क्षेत्रात त्यांनी मोठे नाव कमवूनही त्यांच्या वागण्या-बोलण्यात त्याचा अजिबात लवलेशही जाणवत नाही. त्यांचे आपुलकीने बोलणे व वागण्यातील कमालीचा साधेपणा जाणवल्याशिवाय राहत नाही. यमुनाबाईंच्या तमाशा व लावणी क्षेत्रातील दखल घेऊन राज्य सरकारने त्यांना लावणीसम्राज्ञी पुरस्काराने सन्मानित केले. 1994 मध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले. तसेच महाराष्ट्र गौरव पुरस्कार, अखिल भारतीय जागतिक परिषद पुरस्कार आदी विविध पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. त्यांच्या लावण्यांवर अभ्यास करून अमेरिकेतील एका विद्यार्थिनीने डॉक्टरेट मिळविली आहे. तसेच लावणीवर तयार झालेला ग्रंथ कॅलिफोर्निया विद्यापीठात अभ्यासासाठी ठेवण्यात आला आहे. हा त्यांच्या कलेला मिळालेला मानाचा मुजरा आहे. कलाकार म्हणून त्यांचे वेगळेपण आहेच. मात्र, सामाजिक बांधिलकी जपण्यातही त्या मागे नाहीत. वाईत कोल्हाटी समाजासाठी घरे बांधण्यासाठी पुढाकार घेऊन त्यांची भटकंती थांबवली. त्याचप्रमाणे अखिल महाराष्ट्र कोल्हाटी समाज संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा घेऊन समाज व्यसनमुक्त होऊन शिक्षणाकडे वळावा, यासाठी मोठी धडपड केली. त्यांच्या या धडपडीला आता यश मिळू लागले आहे.महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीने नुकत्याच मुंबईत झालेल्या कार्यक्रमात त्यांना मानपत्र व गौरववृत्ती देण्यात आली. वयाच्या नव्वदीतही या कार्यक्रमास त्या उपस्थित राहिल्या होत्या. आता दगदग सहन होत नाही, अशी भावना त्यांच्या बोलण्यातून जाणवते. रसिकांनी भरभरून दिलेल्या प्रेमाबद्दलची कृतज्ञता त्यांच्या डोळ्यातून ओसंडून वाहते.
Sunday, April 4, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment