Wednesday, March 17, 2010

माणुसकीची मिणमिणती पणती
फादर फ्रान्सिस दिब्रिटो

समाजजीवनाचे भ्रष्टीकरण होत आहे. झटपट पैसे कमावण्याच्या शर्यतीत सारे उतरले आहेत. या स्पर्धेत माणुसकी आणि मूल्ये यांचा बळी पडत आहे. तरीही वाऱ्यावादळाशी आणि पाऊसपाण्याशी झुंज देत एखादी पणती मिणमिणत असते. तीच मानवतेची तारणहार ठरत असते.कोल्हापूरचा कार्यक्रम संपवून पुण्याला आलो. थोडा लवकर पोचलो. हिवाळ्याचे दिवस होते. अंधार रेंगाळत होता आणि गार वारे बोचत होते.बाहेर पडलो. "भाऊ, कुठे जायचे आहे?'' एकामागून एक रिक्षाचालक विचारत होते. "नारायण पेठ पोलिस चौकी,' असे सांगताच रागाचा कटाक्ष टाकून खांदे उडवत दुसऱ्या गिऱ्हाइकाकडे ते धावत होते.तिथे काही बायाबापड्या होत्या. लेकुरवाळ्या होत्या. त्यांच्या हातात वजनी पिशव्या होत्या. नाना-नानी होते; पण जवळचे भाडे घेण्यास कोणीच तयार नव्हते. आचार्य अत्रे यांनी नवयुग पाठमालेत पुणेरी टांगेवाल्यांविषयी लिहिलेली गोष्ट आठवली. त्यानंतर मुळामुठेतून कितीतरी पाणी वाहून गेले आहे. पुण्याचे स्वरूप पार बदलून गेले आहे. आर्थिक सुस्थिती आली आहे. शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात पुण्याने फार मोठा पल्ला गाठला आहे. स्वरूप बदलले; पण त्याबरोबर साऱ्याच सवयी बदलल्या असे नाही. इंग्रजीत एक म्हण आहे- ओल्ड हॅबिट्‌स डाय हार्ड!एक रिक्षा आली. रिक्षाचालकाला विनंती केली. "बसा भाऊ,'' तो प्रेमाने म्हणाला. त्याने मीटर सुरू केले आणि मगच विचारले, ""कुठं जायचं आहे?''"भाऊ, इथं इतके रिक्षावाले आहेत; पण कुणीच का येत नाही गावात?''"आहो, ही बोहनीची वेळ. रामप्रहरी तरी कुणाला काही सांगू नये. माशा मारत बसतील; पण जवळचं भाडं करणार नाहीत. त्यांना लांबची भाडी हवी आहेत. तीही मीटर न लावता. प्रसंगी दोन-अडीचशे रुपये मागतात. लोक अडलेले असतात हो. एकाच मार्गावरून जायचं असलं, तरी दोघातिघांना एकत्र कोंबून प्रत्येकाकडून पैसे उकळतात...'' तो बोलतच होता. जातीबरोबर माती खावी, असे म्हणतात. सारेच आपल्या व्यवसाय बंधूंना सांभाळून घेत असतात. त्या पार्श्‍वभूमीवर त्याचा परखडपणा पाहून मी भारावलो."बाबा आढाव माझे मित्र आहेत. त्यांना मी या अडवणुकीबद्दल सांगणार आहे.''"तो देवमाणूस आमच्यासाठी खूप झटतो; पण ते तरी काय करणार? प्रत्येकासोबत एखादा पोलिस देणार का?''"समोर ट्रॅफिक पोलिस आहेत. ते का प्रवाशांच्या मदतीला धावत नाहीत? मुंबईत दादरला किंवा विमानतळावर अशा नाठाळांना पोलिसांच्या दंडुक्‍यांचा प्रसाद मिळतो.'' मी.माझ्याकडे वळून पाहत तो म्हणाला, ""आहो, इथंच घोडं पेंड खातं. त्यांचं एकमेकांशी संगनमत असतं. काहीच करणार नाहीत पोलिस...''"आमचं पोट रिक्षावर अवलंबून आहे. मेहनत केली आणि सच्चाईनं वागलो, तर चार पैसे मिळतात. मोठमोठी दुकानं आहेत, मॉल आहेत. तिथं गिऱ्हाईक येतं. घासाघीस करतं. सौदा पटला नाही, तर निघून जातं. आमच्या धंद्याचं तसं नाही. रिक्षाची चाकं रस्त्याला लागली रे लागली, की आमची कमाई सुरू होते. आणि हे बघा साहेब, हे लोक अव्वाच्या सव्वा भाडं आकारतात. अडवणूक करून प्रवाशांना लुबाडतात; पण हा सारा पैसा घरी जातो का?'' तो बोलतच होता."कुठे जातो?'' मी विचारले."काय सांगू तुम्हाला? तुम्हीच समजून घ्या. घामाचाच पैसा आपल्या घरी येतो. हरामाच्या पैशाला वेगवेगळ्या सतरा वाटा फुटतात,'' तो तत्त्वज्ञान सांगत होता.दरम्यान, आम्ही "स्नेहसदन'च्या दारात पोचलो. रिक्षाचालक, पोस्टमन, बस कंडक्‍टर आदींच्याबाबत मला विशेष प्रेम वाटते. इतरांप्रमाणे त्यांच्याकडे "जादा' कमाईचे मार्ग नसतात. त्यांना बक्षिसी देण्यात आनंद वाटतो. मी त्याला भाड्यापेक्षा थोडे जास्त पैसे दिले. त्याने ते परत केले."दादा, नाव काय तुमचे? बोलण्याच्या ओघात विचारायचे राहून गेले.'' मी."अब्दुल्ला,'' तो."इतकं सुंदर मराठी बोलता तुम्ही?''"साहेब, मराठी माझी मायबोली आहे. पुण्यातच माय मराठीच्या अंगाखांद्यावर वाढलो...''"पोटाची खळगी भरण्यासाठी खूप खटपटी, लटपटी केल्या. शेवटी ही रिक्षा भेटली. गिऱ्हाईक माझं दैवत आहे. मी कोणालाही कधीही नाही म्हणत नाही. चार पैसे खिशात पडतात. संसाराचा गाडा हाकता येतो. प्रामाणिकपणे कष्ट केले, तर अल्लाह नाही ठेवत उपाशी.'' निघताना तो म्हणाला.त्याचा नितळ, पारदर्शी स्वभाव, गिऱ्हाइकाबद्दल वाटणारा जिव्हाळा आणि मायमराठीवरील प्रेम पाहून मी अचंबित झालो. मी त्याला न्याहारीसाठी येण्याचा आग्रह केला; पण हातची गिऱ्हाइके जातील, म्हणून त्यानं नम्रपणे नकार दिला. समाजजीवनाचे भ्रष्टीकरण होत आहे. झटपट पैसे कमावण्याच्या शर्यतीत सारे उतरले आहेत. या स्पर्धेत माणुसकी आणि मूल्ये यांचा बळी पडत आहे. तरीही वाऱ्यावादळाशी आणि पाऊसपाण्याशी झुंज देत एखादी पणती मिणमिणत असते. तीच मानवतेची तारणहार ठरत असते.

No comments:

Post a Comment