"पुढारी' नको...!
"सकाळ'ने मध्यंतरी तबलानवाझ झाकीर हुसेन यांचा अत्यंत सुंदर कार्यक्रम घेतला. दुसऱ्यादिवशी कोल्हापुरातील एका सजग महिलेचा फोन आला, तो दोन कारणांसाठी. एक असे की इतका मोठा कलावंत "सकाळ' मुळे कोल्हापुरात आला, त्याबध्दल आभार आणि दुसरे असे की त्या कार्यक्रमात "सकाळ'ने एकाही राजकीय पुढाऱ्याला व्यासपीठावर येवू दिले नाही त्याबध्दल विशेष आभार. गेल्याच पंधरवड्यात देशातील सर्वात विश्वासार्ह व्यक्ती म्हणून ज्यांचा गौरव झाला ते माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुलकलाम यांचा कोल्हापूर दौरा झाला. त्या दौऱ्यातही केशवराव भोसले नाट्यगृहातील कार्यक्रमात त्यांनी "चांगला राजकीय नेता' व्हायला किती जणांना आवडेल असे विचारल्यावर कसाबसा एकाच मुलीचा हात वर गेला. सभागृहात चांगल्या शाळेतील उद्याचे भवितव्य म्हणता येतील अशी सातशे मुलं-मुली होती, त्यांतील फक्त एकाच मुलीस राजकीय नेता व्हावा, असे वाटावे, यातच राजकीय पुढारी या जमातीबध्दल समाजात किती खोलवर नाराजीची भावना आहे हे ध्यानात येवू शकेल.नगरसेवकांपासून आमदार-खासदारांपर्यंत बहुतेक राजकीय नेत्यांचे वागणे सारखेच असते, अशी समाजाची धारणाच बनली आहे. लोकांच्या घामातून उभ्या राहणाऱ्या संपत्तीवर हे लोक डल्ला मारतात आणि आपल्यासाठी कांहीच करत नाहीत असाही रोष वाढतो आहे. राजकीय पुढाऱ्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे आपल्या मुलाची संधी डावलली जाते असेही त्याला वाटते. दिलेला शब्द आणि वेळ कधीच न पाळणारा माणूस अशी राजकीय पुढाऱ्याची समानार्थी संज्ञा बनली आहे. आता राजकारणात येणारी पिढीही राजकीय पुढाऱ्यांच्याच घरांतील आहे. तिथेही सामान्य माणूस गावकुसाबाहेर. म्हणून राजकीय पुढारी होवून समाजसेवा करण्याचा विचार नव्या पिढीला खुणावत नाही. तेदेखील "करिअर' असू शकते असा तो विचारच करू शकत नाही. खरेतर आपल्या जगण्याशी संबंधित अनेक विषय ज्या व्यवस्थेशी संबंधित आहेत, त्या व्यवस्थेवर समाजाने दाखविलेला हा अविश्वास आहे.आपल्या देशाने राजकीय लोकशाही स्विकारली आहे. या लोकशाहीने सामान्य माणसाला अमुल्य असा मताचा अधिकार दिला आणि आपले राज्य कुणी करायचे हे ठरविण्याची ताकद दिली. परंतू ही ताकद अनेक कारणांनी दिवसेंदिवस क्षीण होत चालल्याचे चित्र दिसते. त्याचेच प्रतिबिंब व्यापक अर्थाने समाजमनांत उमटताना दिसते. त्यामुळेच राजकीय पुढारी व्हायला कुणाचे हात वर यायला तयार नाहीत, त्याचप्रमाणे विश्वासार्ह व्यक्ती म्हणून समाज त्यांना मान्यता द्यायला तयार नाही. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले अशी श्रध्दा बाळगणारा आपला समाज आहे. त्या श्रध्देला तडे गेल्यानेच लोकांची राजकारणाबध्दल नकारात्मक मानसिकता तयार होत आहे.त्यामुळेच सोनिया गांधीपेक्षा लोकांना डॉ.कलाम हे अधिक विश्वासार्ह वाटतात. कुठेही गेलो तरी लोकांना "पुढारी तेवढे नकोत.. अशी सार्वत्रिक चीड दिसते ती राजकीय नेतृत्वाला आत्मचिंतन करायला लावणारी आहे. - विश्वास पाटील
Monday, March 8, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment