Tuesday, February 16, 2010

दु:खाचा शोध घेतलाच पाहिजे!
झेपावणाऱ्या पंखांना क्षितिजे नसतात. त्यांना फक्त झेपेच्या कवेत येणारे आकाश असते... उद्याच्या उड्डाणांचे आकाश पाहायचे असेल, तर नव्या पिढीने बदललेच पाहिजे. या बदलात सकारात्मकता हवी. बदलही विधायक हवेत. आपल्याला सुंदर जग हवे आहे ना; मग दुःखाचा शोध घेतला पाहिजे.काळ किती बदलतो बघा. परवा मी नागपुरात होतो. अर्थात, महत्त्वाच्या कामानिमित्तानेच गेलो होतो. अशोकवनात थांबलो होतो. सोबत गोपाळ फडणीसही होता. त्याचा भाऊ विवेक "व्हीसीए'चा सदस्य आहे. अनायसे भारत-दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट सामना सुरू होता. त्याने दोन तिकिटे दिली. आम्हाला थोडा वेळही होता. मंदाला खरेदीसाठी शहरात जायचे होते. मला त्या खरेदीत काही रस नव्हता. मी आणि गोपाळ सामना बघण्यासाठी जामठ्याच्या "व्हीसीए' स्टेडिअमवर गेलो. अगदी भोजनापर्यंतचा सामना बघून लगेच परतलोसुद्धा. "जंगलातून मैदानात' अशा फोटोओळींसह सामना बघतानाचे आमचे छायाचित्र वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले. फावला वेळ होता, म्हणून गेलो होतो. एरवी आमच्या वाट्याला असे वेळखाऊ मनोरंजन कधी आले नाही. एकतर हेमलकशात करमणुकीची साधने नव्हती. महाविद्यालयात असतानाही मी फारसा क्रिकेट वगैरे खेळलो नाही. कॉमेन्ट्री ऐकण्यापलीकडे माझे वेड पुढे गेले नाही. आमचा दुवाकॉलेज सुटले. मी इकडे आलो, तेव्हाही कॉमेन्ट्री ऐकणे कधीमधी सुरू होते. इकडे त्या काळात ना वृत्तपत्रे यायची, ना पुस्तके. जगाशी संबंधच नव्हता म्हणा ना! एकमेव ट्रान्झिस्टर होता. तो आमचा आणि जगातील दुवा होता. त्यावर आम्ही बातम्या ऐकायचो. स्थानिक स्टेशन्स खर्र-खर्र अशा आवाजासह ऐकावी लागायची. बीबीसी मात्र लागायचे. साधे आणीबाणीचेच उदाहरण घ्या. 26 जून 1975 ला लागू झालेली आणीबाणी आम्हाला कित्येक दिवस कळलीच नाही. प्रचंड पाऊस सुरू झाला असल्याने हेमलकशाचा उर्वरित भागाशी संबंध तुटला होता. मी बाप होणार होतो. मंदाची आबाळ नको म्हणून ताई तिला इथून घेऊन गेली होती. दिगंतच्या म्हणजेच पिलूच्या जन्माची बातमी नागपूरहून हेमलकशाला पोचायला महिना लागला. साक्षात बापालाच महिनाभरानंतर बातमी समजावी, असे तेव्हाचे अवघड दिवस होते. बाबांनी जगनला नेहमीप्रमाणे फोन केला होता. तो निघालाही; मात्र पावसाने सारे रस्ते अडवून ठेवले होते. तो तरी काय करणार?जन्मानंतर महिनाभरातच पिलूला डायरिया झाला. त्यामुळे जगन पुन्हा हेमलकशाला निघाला. माझ्या मुलाच्या जन्माची "बातमी' मला त्याच्या आजारपणामुळे महिनाभराने कळली. नाल्यानजीक जीप ठेवून जगन सायकलने हेमलकशात पोचला होता. निरोप कळल्यावर मी त्याच्यासह जीपशेजारी आलो. जीप दिसेचना. पाहतो तर नाल्याच्या प्रवाहात वाहून गेली होती. नेमका मोठा दगड आडवा आल्याने ती अडकून पडली. मग आम्ही हिकमतीने दगड काढला. बंद पडलेली जीप कशी तरी सुरू केली. पाणी ओसरल्यानंतर आनंदवनसाठी रवाना झालो. आम्ही पोचलो तोवर रात्र झाली होती. आज ते सारे दिवस आठवले, तरी अंगावर शहारे येतात. काहीही सुविधा नसताना साऱ्या हालअपेष्टा कशा सोसल्या असतील, याचे आश्‍चर्यही वाटून जाते. एकमात्र खरे, या साऱ्यांमागे प्रेरणा होती, उद्दिष्ट होते- जगाला सुंदर करण्याचे. आज विश्‍वासाने वावरणारे आदिवासी दिसले की खूप बरे वाटते. जग बदलले. खेड्यापाड्यात टीव्ही पोहचला. परवा क्रिकेट सामना बघून आल्यानंतर या सर्व गोष्टी आठवायला लागल्या. काम हाच विरंगुळा !तेव्हा एक बरे होते. कामे एवढी असायची, की फावला वेळ उरायचाच नाही. पेशंट नसताना मी दाट जंगलात जायचो. जळाऊ लाकडे आणावी लागायची. मी ट्रॅक्‍टर चालवायचो. बांधकामासाठी दगड आणावे लागायचे. मी एकटाच जायचो असेही नाही. आम्ही सर्व जण मिळून सारी कामे करायचो. दिवसभर कोणत्या ना कोणत्या कामात आम्ही सर्व गुंतलेलो असायचो. कामांनी थकल्यामुळे रात्री झोप यायची. तसे बऱ्यापैकी वाचनही चालायचे. त्या काळात गाजलेली पुस्तके मी वाचून काढली होती. हे कार्य चालायचे कंदिलाच्या प्रकाशात. लाइट नव्हतेच ना! सुटीचा वेळ मिळालाच, तर मी जंगलात भटकून यायचो. अगदी दूरवर चालत जाऊन अनेक व्यक्तींना भेटणे हा माझा छंद होता. तेवढाच विरंगुळा. मंदाला बागकाम आवडायचे. ती फळझाडे, फुलझाडांमध्ये रमायची. आदिवासींकडे धड कपडे नव्हते. साध्या लंगोटीवर ते राहायचे. माडिया फारसे कपडे घालायचे नाहीत. कमरेला फडके बांधले, की झाला त्यांचा पोशाख. लहान मुलांच्या अंगावर लंगोटसुद्धा नसायचा. तेव्हा सरकारची एक "जनता योजना' सुरू होती. 20 रुपयांत वस्त्रोद्योग महामंडळात जनता साड्या मिळायच्या. शंभराची साडी फक्त वीस रुपयांत मिळायची. मंदा या साड्या आदिवासींपर्यंत पोचवायची. स्वस्त कापड मिळाल्याने त्यांनाही ते परवडायचे. अशी काही कामे आम्ही वाटून घेतली होती. खरे सांगायचे तर, "रिकामे मन सैतानाचे घर,' या उक्तीप्रमाणे आम्ही स्वतःला सतत व्यस्त ठेवायचो. माझ्यासह सर्व मित्रांनी सर्व प्रकारची कामे केली आहेत. अगदी संडाससुद्धा साफ केले आहेत. तेव्हाचे संडास म्हणजे, खड्डा खोदून माती टाकायची पद्धत होती. कामाची लाज आम्ही बाळगली नाही. श्रमांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचा संकल्प केल्यानंतर कष्टसुद्धा हलके होऊन जायचे. आदिवासी उघडेनागडे राहायचे; पण त्यांचा प्रामाणिकपणा आम्हाला भावला होता. ते कष्टाळूही होते. हाफपॅन्ट हाच पोशाख !कॉलेजमध्ये असतानाही मी साधा शर्ट-पॅन्ट घालायचो. इथे आल्यावर पायजमा शर्ट घालायला लागलो. कुडकुडणाऱ्या थंडीत उघड्या शरीराने हिंडणारे आदिवासी बघून आपल्याला पूर्ण कपडे घालायला मिळतात, याचीही लाज वाटायची. तेव्हापासून मी हाफपॅन्ट आणि अर्ध्या बाह्यांचा बनियन वापरायला सुरवात केली. हाच माझा पोशाख झाला. बाहेर जायचे असेल तेव्हा फक्त पायजमा सदरा घालायचो. एरवी माझा हाफपॅन्ट-बनियनचा पोशाख ठरलेला असायचा. अगदी आजपर्यंत ती सवय कायम आहे. सगळेच कार्यकर्ते असे कपडे घालायचे. गरज नसलेल्या गोष्टी टाळायच्या, हे ठरवून टाकले. एकेक गोष्टी आपोआपच सुटत गेल्या. केसांना तेल लावणे बंद केले. कंगव्याचीही गरज वाटेनाशी झाली. टायरच्या चपला अंगवळणी पडल्या. स्वतःची आणि अनेकांची कटिंग मी कित्येकदा करून दिली आहे. त्यात काही वेगळेही वाटायचे नाही. सारे काही सवयीवर अवलंबून असते. आजकालचे मोबाईलवेड बघितल्यावर तेव्हाच्या जगण्याचा अचंबा वाटतो. आता सेकंदा सेकंदाला बातमी येते. तेव्हा कित्येक महिने काही कळायचे नाही. एखादी गंभीर घटना घडली तरी आमच्यापर्यंत येईस्तोवर सर्व काही "सेटल' झालेले असायचे. काही बातमी आली नाही, म्हणजे सर्व काही व्यवस्थित आहे, असा आमचा समज होता. आता परिस्थिती बदललीय. ट्रान्झिस्टर गेले. घरोघरी मोबाईल आले आहेत. जंगल प्रदेशातही डिश ऍन्टेने पोचले. हेमलकशाजवळच्या सर्व खेड्यापाड्यांत क्रिकेट आले. जंगल तुटले. गावागावात मैदाने झाली आहेत. पोराटोरांच्या मॅचेस होतात. गर्दीही होते. काळानुसार बदल होणारच. मी तरी आजवर "कॉमेन्ट्री'पलीकडे कुठे पोचलो होतो? अगदी विदेशात जाऊन आलो असलो, तरी क्रिकेट सामना बघण्याचा योग मात्र प्रथमच जुळून आला. काळाने घेतलेली झेप ओघाओघाने आठवली. कोणताही बदल आत्मसात केला पाहिजे. "ज्वाला आणि फुले'मध्ये बाबा म्हणतात ते खरे आहे. झेपावणाऱ्या पंखांना क्षितिजे नसतात. त्यांना फक्त झेपेच्या कवेत येणारे आकाश असते... उद्याच्या उड्डाणांचे आकाश पाहायचे असेल, तर नव्या पिढीने बदललेच पाहिजे. या बदलात सकारात्मकता हवी. बदलही विधायक हवेत. आपल्याला सुंदर जग हवे आहे ना; मग दुःखाचा शोध घेतला पाहिजे. स्वतः कष्ट उपसले पाहिजेत. सर्व सुंदर बदलांच्या स्वागतासाठी अधीरही झाले पाहिजे.

No comments:

Post a Comment