मा. दीनानाथांसारख्या प्रतिभासंपन्न पित्याकडलं लाभलेलं स्वरांचं अनमोल धन, विलक्षण जिद्दी मन घेऊन आशाताईंनी पार्श्वगायनाच्या प्रांतात पाऊल ठेवलं, त्याला आता जवळजवळ साठ वर्षे होत आली.
सहा दशकं उलटली तरी आपल्यासारख्या रसिकांना मंत्रमुग्ध करण्याची ताकद त्यांच्या आवाजात कायम आहे. बालपण, तारुण्य आणि वृद्धत्व, या वयाच्या सर्व टप्प्यांत आणि पहाटेपासून उत्तररात्रीपर्यंत, दैनंदिनीच्या कुठल्याही वळणावर "आशाताईं'च्या सुरांनी उभारीच दिलेली आहे."उठी श्रीरामा'सारख्या भूपाळीतून पहाट प्रसन्न केलीय, "पंढरीनाथा झडकरी आता' किंवा "येगं येगं विठाबाई'सारख्या लालित्यपूर्ण भक्तिगीतांनी, दुपारच्या शांत वातावरणात पोटात खड्डा निर्माण केलाय. "नाच रे मोरा'नं शाळकरी सवंगडी भेटल्याचा आनंद दिलाय. "केव्हातरी पहाटे' किंवा "ही वाट दूर जाते'सारखं भावगीत असो, "रेशमाच्या रेघांनी'सारखी लावणी असो, आशाताईंच्या वैविध्यपूर्ण मराठी गीतांनी तांबड्या मातीतल्या साध्या माणसांना, वर्षानुवर्षे जगण्याचं बळ दिलंय.भावगीतांचा टप्पा बदलला, स्वररचनेचे आकार बदलले, रुची बदलली, पण आशाताईंचा आवाज बदलत्या प्रत्येक वळणावर अनोखे रूप घेऊन आपल्यासमोर आलाय. "तरुण आहे रात्र अजुनी' असो, गुलामअलींची गझल असो, नाट्यगीताचा तुकडा असू दे किंवा "जानम समजा करो'ची सुरावट असो, अनेक शब्दकार, संगीतकारांना, त्यांच्या शब्दस्वरांना आपल्या सुरांनी, आशाताईंनी "ताजा ग्रंथ' दिलाय.आपल्या मरगळलेल्या, गांजलेल्या आयुष्याला उभारी देणारा सुरांचा हा झंझावात आहे. आपल्या साऱ्यांच्या दैनंदिनीत सहजतेनं एकरूप झालेला. वैयक्तिक संकट-अडचणी बाजूला ठेवून, प्रसन्नपणे रंगमंचावरून सामोरे येत आपलेही ताणतणाव क्षणात दूर करणारा, सुरांचा हा चैतन्यदायी सुरेल आविष्कार आहे.तब्बल पंचवीस वर्षांपूर्वी मुंबई दूरदर्शनच्या जमान्यात अरुण काकतकरांच्या सौजन्यानं मी आशाताईंची प्रथम छोट्या पडद्यासाठी प्रकट मुलाखत घेतली. ८५ सालचा सप्टेंबर महिना. शहर मुंबई. फोर्टमधला आशिष स्टुडिओ. साईबाबावाल्या पांडुरंग दीक्षितांचा मुलगा "आशिष' केसातून हात फिरवत, सतत फिरक्या घेणारा, एकदम गंभीर झालेला असतो. कारण कोणत्याही क्षणी आशाताई स्टुडिओत येण्याची शक्यता असते.व्हायोलीन्स लागलेली. बाबूजी म्हणजे सुधीर फडके स्टुडिओत पोचलेले. मुलाखतीत ऐकवायच्या गाण्याचं रेकॉर्डिंग-कम-चित्रण करण्यासाठी आशाताई येणार असतात. त्यांच्या तोंडची गाणी पडद्यावर ज्यांच्यावर चित्रित होतात, त्या "नायिका' आपण नेहमी पाहतो, पण ती गाणी गाणाऱ्या पडद्यामागच्या "गायिका' मात्र प्रथमच पडद्यावर दिसणार असतात. स्टुडिओचा दरवाजा लोटताच मोगऱ्यासारखा वास देणाऱ्या इन्सेसचा गंध दरवळतो. पाठोपाठ खळाळत हसत आशाताई, स्काय ब्ल्यू काठाची पांढरी साडी, त्याच रंगाचे रेडिमेड फूल डोक्यात खोचलेले, अशा आत शिरतात. "चला आशिष, लवकर रेकॉर्डिंग करू या. मला नंतर "मेहेबूब'मध्ये पोचायचंय. एवढ्यात आशाताईंना "बाबूजी' दिसतात. क्षणात त्या विनम्र होतात. "नमस्ते बाबूजी...' निम्म्या झुकत हात जोडून नमस्कार करतात. "गीत रामायणा'त तल्लीन झाल्यानंतर हलते तशी मान हलवत, बाबूजी उजव्या हाताची एक तर्जनी नाचवत, आशाताईंकडे बघत आम्हाला सांगतात... "जशास तसे'मध्ये आशा प्रथम माझ्याकडे गायली.' लगेच आशाताई त्यांचे शब्द खोडतात... "नाही बाबूजी...' "जाळ्यात गावलाय मासा...!' पुढचं पाऊल. दोघांचे डोळे जुन्या आठवणींनी लकाकतात. "जिवलगा कधी रे येशील तू' गाण्याचं टी.व्ही.साठीचं रेकॉर्डिंग संपतं. बाबूजींचे डोळे पाणावलेले. ""त्या परमेश्वराची कृपा आहे. काय बाई आहे ही! पंचावन्न मध्ये मी प्रथम हे गाणं रेकॉर्ड केले अगदी तसाच आवाज. जागान् जागा तीच. कमाल आहे.'' बाबूजींना गदगदून येतं. बाबूजींच्या स्तुतीनं आशाताई संकोचतात. मान डावीकडे झुकवत, रुमाल मानेवर टिपत, काहीशा हसत, डोळ्यांतून साऱ्यांना "धन्यवाद' देत स्टुडिओबाहेर पडतात.इथून माझा त्यांच्याबरोबरचा गप्पाष्टकांचा प्रवास सुरू होतो. कधी प्रभुकुंज, पेडर रोड, कधी खारच्या हेमंतच्या फ्लॅटवर, कधी बर्मन साहेबांचा हॉल, कोल्हापूरचं मैदान, नाशिक वा नागपूरच्या हजारो रसिकांसमोर विस्तारलेलं स्टेज, बडोद्याच्या महाराजांचा दरबार, जिव्हाळ्याच्या बोरिवलीकरांसमोर वा नेहरू स्टेडियमच्या प्रांगणात किंवा ठाण्याच्या "इंद्रधनू'त किंवा अमेरिकेतल्या "सॅन होजे'च्या अधिवेशनात खचाखच भरलेल्या अनिवासी भारतीय मराठी संमेलनात. ऐन पंचाहत्तरीत मुसळधार पावसात पुण्यातल्या रमणबाग शाळेत भिजत, तेवीस गाणी म्हणण्याचा दुर्दम्य उत्साह. सतत इतक्या वर्षांत मी त्यांना खळाळत, उत्साहातच पाह्यलंय. चुकूनही दुर्मुखलेपण नाही.लाल, केशरी, हिरव्या काठांच्या सिल्क साड्या गाण्यागणिक बदलत, डोईवरचं फूल बदलत, कधी नवग्रहांची माळ ठसठशीतपणे गळ्याभोवती पेहनत, कधी पाचू, कधी पोवळं, माणकं, मोती, अशा माळा बदलत, कधी हिऱ्यांची कुडी तर पॅरिसचं मॉडर्न कानातलं लटकवत, मनगटावरचं हिऱ्यामोत्यांनी चकाकणारं ब्रेसलेट आकाशाच्या दिशेनं भिरकावत आशाताई, हातातल्या माईकवरून, पंचाहत्तरीच्या उंबरठ्यावरही, "ले गई ले गई... मुझको हुई ना खबर' देशोदेशीच्या रंगमंचावरून म्हणू लागतात, तेव्हा त्यांची नातवंडं शोभतील, अशा वयाची श्रोत्यांमधली जनरेशनही बेभान होते, डुलायला लागते."विचारल्यावीण हेतू कळावा, त्याचा माझा सूर जुळावा...' म्हणता म्हणता अचानक घेतलेली आशाताईंची "तान,' अचानक आलेल्या वळवाच्या सरीचा प्रसन्न आनंद देते. "का रे अबोला'मधील "आर्जव,' "आ आ आजा' मधला "खळाळ,' "मेरा नाम है शबनम' म्हणत गाता गाता केलेला नटखट "संवाद,' "मुहब्बत क्या कहीये' म्हणत "गझल'चा नेमका पकडलेला चालू "ट्रेंड,' "सोना रे सोना रे...'मधून येणारी "नयी निखार,' "दिल चीज क्या है...' ऐकताना लखनौचा सरंजामीशाही महाल डोळ्यांसमोर उभं करणं, "पान खाये सैयॉं'मध्ये आठवणारी नौटंकीवाली, "शूरा मी वंदीले' म्हणताना दीनानाथांना केलेलं वंदन, कधी एखाद्या गाण्यातला "खटका,' तर कधी गाता गाता हसणं. त्या गात असतानाची किती किती रूप अनुभवलीयत. त्या नुसत्या "गायिका' नाहीत, तर प्रत्येक "शो' हिट करणाऱ्या बेस्ट परफॉर्मरही आहेत.केसाचा बुचडा बांधत, तोंडाला कसलंसं तेल चोपडत, त्या त्यांच्या मुंबईतल्या पेडर रोडवरच्या "प्रभुकुंज'मधल्या फ्लॅटच्या खोलीतून बाहेर येतात आणि हॉलमध्ये समोर अचानक उभे ठाकलेले, आपण कुणी ओळखीचे दिसलो की भरभरून हसतात. "माणसांनी आपल्याकडे यावं' ही आपुलकी, अगत्य त्या हसण्यात पुरेपूर भरलेलं असतं. "आलेच हं' असं म्हणत, क्षणात आत पळतात. फटदिशी टिनोपॉल व्हाइट कॉटन साडी नेसून, एकदम ताज्या तवाण्या, प्रसन्न मुद्रेनं तुम्हाला सामोऱ्या येतात.मनात येईल ते मनःपूर्वक बोलून मोकळ्या होतात. राग आला तर साऱ्यांसमक्ष चिडतात, फटकारतात आणि स्वतःची छोटीशी जरी चूक लक्षात आली, तरी "इमेज'चा बाऊ न करता, फट्दिशी "माफ करा हं' म्हणत खळाळतात.इतक्या निकोप, निखळ, स्वच्छ असल्यानंच, गाण्यातही त्यांचं निकोप मन उतरते आणि मग ते गाणं मनाइतकंच उत्कट बनतं. घरात कुणाला बरं नाहीसं झालं, तर "पूजा' बोलतात. मंत्रोच्चार करवतात. उत्कट -हळुवारपणाबरोबरच, "परवशता पारा दैवी'सारखं आक्रमक गाणं म्हणणाऱ्या आशाताई वेळप्रसंगी कणखरही आहेत. सांसारिक टक्केटोणपे खाऊनही म्हणूनच त्या टिकून आहेत.गाणं असो वा खाणं, "जमत नाही म्हणजे काय?' हे आव्हान त्या कायम स्वीकारतात. "अशक्य' हा शब्द त्यांच्या कोशात नाही. बाबांसारखी नाट्यगीतं म्हणता यावीत म्हणून गणपतराव मोहित्यांकडून "ढब' जाणून घेतली. बाबूजींकडून "उच्चारण' घोटून घेतलं. हवं तिथेच व्हायब्रेशन देत, प्रत्येक शब्द, प्रत्येक भावना, वेगळ्या तऱ्हेनं कशी मांडावी हे बर्मनदांकडून शिकून घेतलं, "शब्द चावू नका, मोकळं गा' ही शब्दांवर लक्ष देण्याची शिकवण, सी. रामचंद्रांनी माहीत करून दिली. त्यामुळे "मलमली तारुण्य माझे' मस्त रंगलं. पं. हृदयनाथ मंगेशकरांच्या सुरावटी ऐकण्यासाठी सोप्या, पण म्हणायला "अवघड,' त्यासाठी मेहनत घेतलीय. एकच आवाज वेगवेगळ्या स्टाइलने कसा आणता येतो त्याचा आत्मविश्वास "दी ट्रेन'पासून सुरू झालेल्या छोट्या बर्मनदांच्या बरोबरच्या प्रवासात वाढला. ध्वनिमुद्रणासाठी ध्वनिक्षेपकासमोर गेल्यावर त्या भोवतीचं सारं विसरतात. राग, लोभ, अन्याय, दुःख सारं सारं विसरून त्या गाण्यातल्या भावनेशी एकरूप होतात. समरस होतात. कारण माईक हाच माझा परमेश्वर आणि गाणं हीच माझी पूजा, यावर त्यांची श्रद्धा आहे.आयुष्यातील चढ-उतारांना, जो क्षण जसा येईल त्याला सामोरं जाणं, हसत जाणे, हा त्यांचा आयुष्यातला पणच आहे. कारण, त्यांचं म्हणणे...माझा रस्ता मी निवडलाय. त्याकरिता कुणाला दोष देणं मला आवडत नाही. मी "स्पष्टवक्ती- फटकळ' असल्याने मला "राजकारणात' आणि राजकारण करण्यात रस नाही.दीदींना त्या मानतात. "चले है तीर नजर के इधर से भी...' हे त्यांच्याबरोबर प्रथम द्वंद्वगीत म्हटले. दीदींनी "आनंदघन' म्हणून संगीतकार या नात्यानं "रेशमाच्या रेघांनी' ही लावणी म्हणवून घेतली. दीदी शेजारी असल्यानं मी म्हटलेली सर्वांत सभ्य लावणी, असं त्या मिस्कीलपणे नोंदवितात. बाळच्या म्हणजे हृदयनाथच्या रचना म्हणताना सर्वांत ताण असतो. तो गाताना गाण्याचे भाव, स्वर, लय, ताल यांना अगदी तपशिलात जाऊन बारकाव्यासह सादर करतो. त्याचं गाणं गाताना भीती वाटते. कारण सुरांच्या बाबतीत त्याचं कडक लक्ष असतं. त्याचं "जिवलगा राहिले रे दूर घर माझे' हे सात मिनिटाचं गाणं मी एका दमात गायलीय. श्वास जातोय कायमचा, असं वाटलं.""नव्या मंडळींनी गाण्याचा भाव अर्थ समजून घ्यायला हवा. संगीतकाराने शब्द कुठे तोडले आहेत, हरकत घेताना आवाजाला कुठे आवळून घ्यायला पाहिजे, ते शिकायला हवं. नुसत्या चाली पाठ करून चालणार नाही,'' असे त्या सुचवतात.पंचाहत्तरीतही त्यांच्या गाण्याची लोकप्रियता टिकून असण्यामागे कारण त्या सांगतात, की जसा जमाना आला, तशी मी बदलत गेले. त्या त्या जमान्याच्या स्टाइलमध्ये अडकले असते, तर संपले असते. सतत सर्वोत्तमच द्यायचं हा ध्यास. त्यामुळे मी गाणं आजही एन्जॉय करते. सुरेश भट आशाताईंना उद्देशून म्हणत...तारुण्य तुझ्या हृदयाचे हे असेच बहरत राहोवार्धक्य तुझ्या जगण्याला हे असेच विसरत राहोतलवार तुझ्या गीतांची, बिजलीसम तळपत राहो।।
)
Tuesday, September 15, 2009
Sunday, September 13, 2009
कृष्णमूर्ती यांच्या सहवासात
जे. कृष्णमूर्ती मानवी जीवनाचा जसा स्वतंत्र विचार करतात तसा शिक्षणाचाही. त्यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांशी साधलेला संवाद शिक्षणाचा नवाच अर्थ सांगतो... ............. जे. कृष्णमूतीर् यांनी धर्माच्या रूढ संकल्पनेलीकडं जावून मानवजातीला उत्क्रांत करील अशा धर्मशील, प्रज्ञावंत मनाच्या निमिर्तीची प्रक्रिया जगासमोर मांडली. मात्र, ते शिक्षणतज्ज्ञ म्हणून माहीत नसतात. त्यांच्या प्रेरणेने कृष्णमूतीर् फाऊंडेशनने जगभर ८ शाळा सुरू केल्या. या शाळांमध्ये विविध प्रयोग केले जातात. कृष्णमूतीर् शिक्षणाकडे जीवनाला नवी दृष्टी देणारे, जगण्याचे नवे आकलन शिकवणारे क्षेत्र म्हणून पाहतात. त्यांनी शिक्षक आणि विद्याथीर् यांच्याशी ज्या चर्चा केल्या, त्या चर्चांची पुस्तके प्रकाशित झाली. अलीकडेच प्रकाशित झालेल्या दोन अनुवादित पुस्तकांमध्ये शिक्षक आणि विद्याथीर् प्रश्ान् विचारतात आणि कृष्णमूतीर् उत्तरे देतात. ही केवळ औपचारिक उत्तरे नाहीत तर कृष्णमूतीर् त्या प्रश्ानच्या मागील अज्ञानालाच आघाताचा विषय बनवून जीवनदृष्टी स्पष्ट करणारी उत्तरे देतात. त्यामुळे प्रश्ान् जरी नेहमीचे असले तरी उत्तरे वेगळी, जीवनभाष्य करणारी आहेत. स्वत:चे आकलन समजावून देणारी आणि अंतरंगाचा बहर उमजून सांगणारी आहेत. प्रश्ान् जरी विविधांगी असले तरी काही महत्त्वाच्या शीर्षकांमध्ये ती सर्व प्रश्ानेत्तरे बांधली आहेत. शिक्षणकार्य, स्वातंत्र्य, श्ावण, सृजनशील असंतोष, खुले मन, धामिर्कता, धर्मशील मन व विज्ञाननिष्ठ मन, ज्ञान आणि प्रज्ञा, स्वातंत्र्य व सुव्यवस्था, संवेदना, भीती, हिंसावृत्ती, मनातील पूर्वग्रह व प्रतिमा, वागणूक, योग्य शिक्षण, व्यापक दृष्टिकोन, कृती, स्पर्धा, भीती, शिकवणे आणि शिकणे, चांगले मन, नकारात्मक दृष्टिकोन, चिंतन आणि शिक्षण, बहरणे इत्यादी ५० पेक्षा जास्त विषयांवर कृष्णमूतीर् बोलतात. वाचक कृष्णमूतीर्ंच्या शिक्षणविषयक चिंतनात न्हाऊन जातो आणि खऱ्या अर्थाने बहरून जातो. ही तत्त्वज्ञानाची चर्चा असली तरी प्रश्न साधे, सोपे आहेत. विशेषत: विद्यार्थ्यांचे प्रश्ान् अधिक नेमके व निरागस आहेत. 'आपल्याला प्रसिद्ध व्यक्ती का व्हावेसे वाटते?' 'आम्हाला खेळात जितकी मौज वाटते तितकी अभ्यासात का वाटत नाही?' 'आपण गरिबांचा द्वेष का करतो?' 'आम्ही खोडकर का असतो?' 'श्ाीमंत गविर्ष्ट का असतात?' 'मी पक्ष्यांच्या जवळ गेलो तर ते उडून का जातात?' 'मी धूम्रपान करतो तेव्हा शिक्षक माझ्यावर का चिडतात?' अशा प्रश्ानंना कृष्णमूतीर् अगदी सहज तात्त्विक डूब देतात. कृष्णजी म्हणतात की शिक्षण म्हणजे परीक्षा उत्तीर्ण होणे, पदवी मिळवणे, नोकरी पटकावणे व लग्न करणे एवढेच नव्हे तर पक्ष्यांचे कूजन ऐकणे, गगनाचे दर्शन घेणे, एखाद्या वृक्षाचे असाधारण सौंदर्य पाहणे, टेकड्यांच्या आकृत्या पाहणे व अंत:करणाने साथ देणे हे सारेच. ते विद्यार्थ्यांना सांगतात, 'शिक्षकांचे शिकवण्यावर खरेच प्रेम असेल तर तुम्ही अनन्यसाधारण व्यक्ती व्हाल. शिक्षक मनाने मुक्त असतो तेव्हा त्याच गोष्टींचा विद्यार्थ्यांवर प्रभाव पडतो. शिक्षण यशावर प्रेम करायला शिकवते पण आपण जे काही करतो, त्यावर प्रेम करायला शिकवत नाही, याबद्दल कृष्णजी नाराजी व्यक्त करतात. आज स्पर्धा हा प्रतिष्ठित शब्द झाला आहे. परीक्षांमुळे दरवषीर् किमान चार हजार विद्याथीर् आत्महत्या करतात. तरी आपण स्पर्धांना प्रतिष्ठा देतो. स्पर्धा आणि महत्त्वाकांक्षेविषयी कृष्णमूतीर्ंची मांडणी अंतर्मुख करणारी आहे. महत्त्वाकांक्षी माणसाला प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून मान मिळतो. महत्त्वाकांक्षी, आक्रमक मनुष्य, विजीगिषू व प्रतिष्ठित समजला जातो. पण जेव्हा स्पर्धा नाहीशी होते तेव्हाच खरे शिक्षण अस्तित्वात येते. जो मनुष्य काहीतरी बनण्याचा प्रयत्न करतो, तो कुरूप असतो इतके थेटपणे कृष्णमूतीर् सुनावतात. शिक्षणातून समाजपरिवर्तन झाले पाहिजे असे बोलले जाते. पण परिवर्तन नेमके काय? कृष्णमूतीर्ंची परिवर्तनाची संकल्पनाच खूप वेगळी आहे. ते परिवर्तन आमूलाग्र आहे. प्रेम हा त्यांच्या तत्त्वज्ञानाचा गाभा आहे. प्रेमशून्य समाज म्हणजे वाळवंट. ज्याक्षणी जिव्हाळा निर्माण होतो त्याक्षणी जीवन सुंदर होते. तुम्ही खूप हुशार असाल, पण तुमच्या ठायी प्रेमभावना नसेल तर तुमचे सारे आयुष्य दु:खीकष्टी होईल. लहान वयात जर तुम्हाला प्रेमभावना नसेल, लोकांकडे, प्राण्यांकडे, फुलांकडे प्रेमळपणे तुम्ही बघत नसाल तर मोठे झाल्यावर जीवन पोकळ, रिकामे वाटेल. पण ज्या क्षणी प्रेम नावाची भावना जागेल तेव्हा जीवन बदलून जाईल. कृष्णमूतीर्ंचे सारे चिंतन थक्क करणारे आहे. साध्या, सरळ भाषेत ते महान तत्त्वज्ञान सांगतात. शिक्षणातून सत्याचा शोध घेण्याचे, स्वत:चा बोध घेण्याचे सार्मथ्य अंगी यावे, अशी त्यांची मांडणी आहे. तेव्हा शाळेकडून त्यांच्या वेगळ्या अपेक्षा आहेत. 'जगात घडते त्याची शाळा म्हणजे एक छोटी आवृत्ती आहे आणि सर्व विनाशकारी गोंधळ, दु:ख, हालअपेष्टा पाहून वाटते की नव्या मनाची निमिर्ती एवढाच त्यावर मार्ग आहे. ते केवळ योग्य प्रकारच्या शिक्षणानेच घडू शकेल. त्यासाठी शांतपणे बसून मनाचे कार्य बघणे हे वर्गात बसण्या इतकेच महत्त्वाचे आहे. ................. या गोष्टींचा विचार करा लेखक : जे. कृष्णमूर्ती अनुवाद: दिवाकर घैसास पाने: २६०, किंमत: १९५ रुपये
Wednesday, September 9, 2009
बुद्धिबळ तपस्वी
सांगली ही रंगभूमीची पंढरी आहे, तशी ती बुद्धिबळासारख्या खेळाचीही आहे. या सांगली शहरात बुद्धिबळासाठी सातत्याने धडपडणारे एक व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्याशी बोलताना ते किती बुद्धिबळमय झाले आहेत, हे लक्षात येत असे. नरहर व्यंकटेश तथा भाऊसाहेब पडसलगीकर यांनी आपला संसारच बुद्धिबळाशी थाटला होता. जुन्या मंडळींसाठी ते भाऊ किंवा भाऊराव होते. पडसलगीकर यांचे नाव उच्चारले की सांगली आणि त्यांचे नूतन बुद्धिबळ मंडळ ही दोन नावे प्रकर्षांने डोळ्यांसमोर येत असत. बुद्धिबळाच्या खेळासाठी त्यांनी अक्षरश: वणवण केली. बुद्धिबळाचा प्रसार व्हावा आणि तरुण वर्गात हा खेळ लोकप्रिय व्हावा, यासाठी ते विद्यापीठांपासून प्राथमिक शाळांपर्यंत हिंडले. त्यांनी अनेक ठिकाणी व्याख्याने दिली. कुणाच्या खेळण्याने वा न खेळण्याने आपल्यापैकी कुणाच्याही जीवनात फरक पडत नसतो, पण त्यांनी तसे मानले नाही. प्रचंड जिद्दीनिशी त्यांनी बुद्धिबळाच्या स्पर्धा भरवल्या आणि त्या यशस्वी करून दाखवल्या. १९४१ मध्ये जेव्हा त्यांनी आणि त्यांचे मित्र भाऊसाहेब राजवाडे, दाजीसाहेब दीक्षित, सोपानराव शिंगारे यांनी नूतन बुद्धिबळ मंडळाची स्थापना केली, तेव्हा त्यांच्या हातात एक पैसाही नव्हता. ६८ वर्षांमध्ये या परिस्थितीत फार फरक दिसला नाही. बऱ्याचदा स्वत:च्या खिशाला चाट मारूनही त्यांनी ही स्पर्धा यशस्वी केली आहे. वार्षिक स्पर्धेचा काळ आला की भाऊराव पुण्या-मुंबईपासून बेळगावपर्यंत सगळीकडे हिंडायचे. अनेक उद्योजकांकडून, श्रीमंत व्यक्तींकडून त्यांनी थोडेथोडे पैसे जमवूनही स्पर्धा साजऱ्या केल्या, त्यांना कुठेही कमी पडू दिले नाही. तसे पाहिले तर भाऊराव हे बुद्धिबळ आयुष्यभर जगले. त्यांचे वडील बुद्धिबळ खेळायचे, आजोबाही त्या खेळात माहीर होते. १९४६ मध्ये भाऊरावांनी इकडून, तिकडून शंभर रुपये गोळा करून स्पर्धा भरवायला प्रारंभ केला. तेव्हापासून अगदी या वर्षी मे महिन्यापर्यंत त्यांनी त्यात खंड पडू दिला नाही. बुद्धिबळ हा विषय त्यांच्या दृष्टीने समाजकार्याइतकाच जिव्हाळ्याचा होता. सांगलीच्या आदि बलभीम व्यायाम शाळेत तरुण वयात कुस्ती खेळणाऱ्या भाऊरावांनी हुतूतू, खो-खो आदि खेळांमध्येही प्रगती साधली. ते स्पर्धावेडे होते. स्पर्धामध्ये बुद्धिबळ खेळणाऱ्याला इतरांच्या डावपेचांची माहिती होते आणि त्यामुळे खेळाचाच सर्वागीण विकास होतो, यावर त्यांची श्रद्धा होती. परदेशात बुद्धिबळ स्पर्धासाठी वेगळ्या प्रकारची ‘स्टॉप वॉचेस’ असतात, तशी ती आपल्याकडे नाहीत म्हटल्यावर सांगलीच्याच एका घडय़ाळ विक्री करणाऱ्याला प्रोत्साहन देऊन तशी चार घडय़ाळे त्यांनी बनवून घेतली. अनेक बुद्धिबळपटू त्यांनी तयार केले. राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा विजेत्या भाग्यश्री साठे-ठिपसे, स्वाती घाटे यांच्यापासून ते ओंकार पटवर्धन, जयश्री संकपाळ-कदम, पल्लवी शहा, कृष्णा जहागिरदार, अनुप्रिता पाटील, संतोष संकपाळ यांच्यापर्यंत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू त्यांनी तयार केले. त्यांच्या शिष्यगणांची संख्या शेकडोंमध्ये भरेल. २००० मध्ये सांगलीत राष्ट्रकुल बुद्धिबळ स्पर्धाचे त्यांनी आयोजन केले होते. राष्ट्रकुलातल्या देशांचे अनेक सर्वोत्तम खेळाडू त्यात भाग घेणार म्हटल्यावर त्यांच्यासाठी सर्व सोयीसुविधा आवश्यक होत्या. पंचतारांकित काय, पण नाव घेता येईल असे सर्वोत्तम हॉटेल त्यावेळी सांगलीत नव्हते, तरीही त्यांनी या स्पर्धेचा खटाटोप केला. त्यांच्या आवाहनानुसार अनेक देशांच्या खेळाडूंनी त्यात भागही घेतला. या स्पर्धेत भाग घेऊन नावारूपाला आलेला शशिकिरण पुढे ग्रँडमास्टर बनला. रशियाला गेलेल्या कनिष्ठ गटाच्या बुध्दिबळपटूंच्या संघाचे भाऊराव हे प्रशिक्षक होते. ही स्पर्धा सलग पंधरा दिवस चालली. याच काळात भाऊरावांनी एकाच वेळी चाळीस खेळाडूंबरोबर बुद्धिबळाचा डाव मांडून त्यांनी समस्त रशियन प्रेक्षकांना चकित करून सोडले होते. शिवाजी विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे भाऊराव हे सलग ५-६ वर्षे बुद्धिबळ प्रशिक्षक होते. आपल्या मुलांना भाऊरावांनीच बुद्धिबळ शिकवायला हवे, हा पालकांचा आग्रह असे. बुद्धिबळ त्यांच्या अंगात जणू इतके संचारायचे की त्यासाठी एखाद्या खेडय़ात जाऊन राहायलाही त्यांची ना नसे. सांगलीचे दुसरे एक नामांकित बुद्धिबळपटू भा. प. म्हैसकर हेही रशियाच्या स्पर्धेत भाग घ्यायला गेले होते. त्यांनीही आपल्या यशाचे श्रेय भाऊरावांनाच दिले होते. म्हैसकरांबरोबर त्यांचे बुद्धिबळाचे अनेक डाव रंगायचे. १९७९ मध्ये त्यांच्या नूतन बुद्धिबळ मंडळाने केवळ महिलांची बुद्धिबळ स्पर्धा भरवली होती. भारतातल्या १४ राज्यांच्या ४४ महिलांनी त्या स्पर्धेत भाग घेतला होता. नूतन बुद्धिबळ मंडळाची भाग्यश्री साठे त्या स्पर्धेत चौथ्या क्रमांकावर आली, पण तिने पुढे अनेक बडय़ा बडय़ांचे विक्रम मोडीत काढले. ती आशियाई विजेती ठरली. तिने इंग्लंड, फ्रान्स, पोलंड, स्वित्र्झलड, बांगलादेश आदी देशांमधल्या स्पर्धा गाजवल्या. भाऊरावांचे वैशिष्टय़ असे की, एखादी गोष्ट मनावर घेतली की तिचा पिच्छा पुरवायचा. आठ वर्षांखालील मुलांना लवकर बुद्धिबळ समजू शकेल, असे त्यांच्या मनाने घेतले आणि आश्चर्य म्हणजे त्यांची ती स्पर्धा कमालीची यशस्वी झाली. मग त्यांनी ८, १०, १२, १४, १६ आणि १९ वर्षे वयोगटाखालच्या स्पर्धा भरवून त्या यशस्वी करून दाखवल्या. इंग्लंडमध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेणारे विनायकराव खाडिलकर हेही नूतन बुद्धिबळ मंडळाचे खेळाडू. शिवराम नातू, आप्पाकाका खाडिलकर, नारायणराव खाडिलकर हे सगळे भाऊरावांच्याबरोबर खेळात रंगलेले दिसायचे. यात आणखीही एक नाव असे. पुढे राजकवी साधुदास म्हणून प्रसिद्धीस आलेले गोपाळराव मुजुमदारही त्यांच्या या ‘डावा’त असत. भाऊरावांच्या शब्दाखातर अनेक ग्रँडमास्टरही नूतन बुद्धिबळ मंडळाच्या स्पर्धेत दिसायचे. ‘६४ घरांचा राजा’ असे ज्याचे वर्णन केले जाते तो ग्रँडमास्टर विश्वनाथ आनंद सांगलीत खेळला आहे. अभिजित कुंटे, प्रवीण ठिपसे, देवेंद्र बारुआ, रविशेखर, जयश्री आणि रोहिणी खाडिलकर यांनीही सांगलीच्या त्यांच्या स्पर्धामध्ये हजेरी लावली आहे. त्यांच्या स्पर्धामध्ये अलीकडच्या काळात बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ या शेजारी देशांमधल्या खेळाडूंनीही सहभागी व्हायची इच्छा प्रदर्शित केली होती. स्पर्धाच्या तारखा जाहीर झाल्या, की भाऊरावांची स्वारी दौऱ्यावर निघे आणि देणगीदारांचा शोध घेत असे. त्यांनी आपल्या मंडळाकडे कायमस्वरूपी निधी राहील, असे पाहिले, पण क्रिकेटवर सर्वाधिक प्रेम करणारे बडे उद्योजक बुद्धिबळाचे नाव काढले, की ‘पुन्हा केव्हातरी पाहू’ म्हणून त्यांना वाटेला लावत. अशाने ते निराश मात्र होत नसत. वडील तम्मण्णाचार्य यांच्याकडून बुद्धिबळाचा आलेला वारसा सर्व समाजांपर्यंत पोहोचायला पाहिजे, या उर्मीतून ते ठाम असत. त्यांच्या कोशात ‘थकणे’ हा शब्दच नव्हता. सुट्टीच्या काळात शिक्षणसंस्थांच्या सभागृहात ते या स्पर्धा भरवायचे. त्यांना आपल्या मंडळासाठी मोठे सभागृह आणि संग्रहालय उभारायचे होते. स्वित्र्झलडमध्ये लुझानला असलेल्या ऑलिम्पिक संग्रहालयाच्या धर्तीवर त्यांना बुद्धिबळाची ही वास्तू उभारायची होती. त्यासाठी त्यांनी नामांकित वास्तूविशारदांबरोबर चर्चाही केली होती. सांगलीत त्यांना त्यासाठी उत्तम अशी जागा मिळाली, पण त्या जागेवर एका राजकारण्याचा डोळा असल्याने ही जागा देता येऊ शकत नाही, असे सांगत आताच्या सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेने ती द्यायला नकार दिला. भाऊराव पडसलगीकरांचे एक स्वप्न भंगले. वयाच्या सहाव्या वर्षांपासून बुद्धिबळात रंगलेला बुद्धिबळाचा हा भीष्माचार्यही आता उरलेला नाही. शिवछत्रपती क्रीडा कार्यकर्ता, पुढे ‘दादोजी कोंडदेव’ आणि अगदी अलीकडे ‘जीवन गौरव’ पुरस्कार देऊन महाराष्ट्र शासनाने गौरवलेला हा बुद्धिबळ तपस्वी बुद्धिबळाच्या वास्तूसाठी जागेच्या शोधात हिंडत होता. आता कुणी जागा देईलही, पण भाऊराव पडसलगीकर नावाचे धुरंधर व्यक्तिमत्त्व ती ताब्यात घेऊन स्पर्धा भरवायला नसेल, हा दैवदुर्विलास आहे. केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री प्रतीक पाटील सांगलीचे आहेत. त्यांनी आता या कामात पुढाकार घेऊन भाऊरावांच्या स्मृती चिरंतन राहतील, हे किमान पाहावे.
Subscribe to:
Comments (Atom)
