Wednesday, September 9, 2009

बुद्धिबळ तपस्वी

सांगली ही रंगभूमीची पंढरी आहे, तशी ती बुद्धिबळासारख्या खेळाचीही आहे. या सांगली शहरात बुद्धिबळासाठी सातत्याने धडपडणारे एक व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्याशी बोलताना ते किती बुद्धिबळमय झाले आहेत, हे लक्षात येत असे. नरहर व्यंकटेश तथा भाऊसाहेब पडसलगीकर यांनी आपला संसारच बुद्धिबळाशी थाटला होता. जुन्या मंडळींसाठी ते भाऊ किंवा भाऊराव होते. पडसलगीकर यांचे नाव उच्चारले की सांगली आणि त्यांचे नूतन बुद्धिबळ मंडळ ही दोन नावे प्रकर्षांने डोळ्यांसमोर येत असत. बुद्धिबळाच्या खेळासाठी त्यांनी अक्षरश: वणवण केली. बुद्धिबळाचा प्रसार व्हावा आणि तरुण वर्गात हा खेळ लोकप्रिय व्हावा, यासाठी ते विद्यापीठांपासून प्राथमिक शाळांपर्यंत हिंडले. त्यांनी अनेक ठिकाणी व्याख्याने दिली. कुणाच्या खेळण्याने वा न खेळण्याने आपल्यापैकी कुणाच्याही जीवनात फरक पडत नसतो, पण त्यांनी तसे मानले नाही. प्रचंड जिद्दीनिशी त्यांनी बुद्धिबळाच्या स्पर्धा भरवल्या आणि त्या यशस्वी करून दाखवल्या. १९४१ मध्ये जेव्हा त्यांनी आणि त्यांचे मित्र भाऊसाहेब राजवाडे, दाजीसाहेब दीक्षित, सोपानराव शिंगारे यांनी नूतन बुद्धिबळ मंडळाची स्थापना केली, तेव्हा त्यांच्या हातात एक पैसाही नव्हता. ६८ वर्षांमध्ये या परिस्थितीत फार फरक दिसला नाही. बऱ्याचदा स्वत:च्या खिशाला चाट मारूनही त्यांनी ही स्पर्धा यशस्वी केली आहे. वार्षिक स्पर्धेचा काळ आला की भाऊराव पुण्या-मुंबईपासून बेळगावपर्यंत सगळीकडे हिंडायचे. अनेक उद्योजकांकडून, श्रीमंत व्यक्तींकडून त्यांनी थोडेथोडे पैसे जमवूनही स्पर्धा साजऱ्या केल्या, त्यांना कुठेही कमी पडू दिले नाही. तसे पाहिले तर भाऊराव हे बुद्धिबळ आयुष्यभर जगले. त्यांचे वडील बुद्धिबळ खेळायचे, आजोबाही त्या खेळात माहीर होते. १९४६ मध्ये भाऊरावांनी इकडून, तिकडून शंभर रुपये गोळा करून स्पर्धा भरवायला प्रारंभ केला. तेव्हापासून अगदी या वर्षी मे महिन्यापर्यंत त्यांनी त्यात खंड पडू दिला नाही. बुद्धिबळ हा विषय त्यांच्या दृष्टीने समाजकार्याइतकाच जिव्हाळ्याचा होता. सांगलीच्या आदि बलभीम व्यायाम शाळेत तरुण वयात कुस्ती खेळणाऱ्या भाऊरावांनी हुतूतू, खो-खो आदि खेळांमध्येही प्रगती साधली. ते स्पर्धावेडे होते. स्पर्धामध्ये बुद्धिबळ खेळणाऱ्याला इतरांच्या डावपेचांची माहिती होते आणि त्यामुळे खेळाचाच सर्वागीण विकास होतो, यावर त्यांची श्रद्धा होती. परदेशात बुद्धिबळ स्पर्धासाठी वेगळ्या प्रकारची ‘स्टॉप वॉचेस’ असतात, तशी ती आपल्याकडे नाहीत म्हटल्यावर सांगलीच्याच एका घडय़ाळ विक्री करणाऱ्याला प्रोत्साहन देऊन तशी चार घडय़ाळे त्यांनी बनवून घेतली. अनेक बुद्धिबळपटू त्यांनी तयार केले. राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा विजेत्या भाग्यश्री साठे-ठिपसे, स्वाती घाटे यांच्यापासून ते ओंकार पटवर्धन, जयश्री संकपाळ-कदम, पल्लवी शहा, कृष्णा जहागिरदार, अनुप्रिता पाटील, संतोष संकपाळ यांच्यापर्यंत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू त्यांनी तयार केले. त्यांच्या शिष्यगणांची संख्या शेकडोंमध्ये भरेल. २००० मध्ये सांगलीत राष्ट्रकुल बुद्धिबळ स्पर्धाचे त्यांनी आयोजन केले होते. राष्ट्रकुलातल्या देशांचे अनेक सर्वोत्तम खेळाडू त्यात भाग घेणार म्हटल्यावर त्यांच्यासाठी सर्व सोयीसुविधा आवश्यक होत्या. पंचतारांकित काय, पण नाव घेता येईल असे सर्वोत्तम हॉटेल त्यावेळी सांगलीत नव्हते, तरीही त्यांनी या स्पर्धेचा खटाटोप केला. त्यांच्या आवाहनानुसार अनेक देशांच्या खेळाडूंनी त्यात भागही घेतला. या स्पर्धेत भाग घेऊन नावारूपाला आलेला शशिकिरण पुढे ग्रँडमास्टर बनला. रशियाला गेलेल्या कनिष्ठ गटाच्या बुध्दिबळपटूंच्या संघाचे भाऊराव हे प्रशिक्षक होते. ही स्पर्धा सलग पंधरा दिवस चालली. याच काळात भाऊरावांनी एकाच वेळी चाळीस खेळाडूंबरोबर बुद्धिबळाचा डाव मांडून त्यांनी समस्त रशियन प्रेक्षकांना चकित करून सोडले होते. शिवाजी विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे भाऊराव हे सलग ५-६ वर्षे बुद्धिबळ प्रशिक्षक होते. आपल्या मुलांना भाऊरावांनीच बुद्धिबळ शिकवायला हवे, हा पालकांचा आग्रह असे. बुद्धिबळ त्यांच्या अंगात जणू इतके संचारायचे की त्यासाठी एखाद्या खेडय़ात जाऊन राहायलाही त्यांची ना नसे. सांगलीचे दुसरे एक नामांकित बुद्धिबळपटू भा. प. म्हैसकर हेही रशियाच्या स्पर्धेत भाग घ्यायला गेले होते. त्यांनीही आपल्या यशाचे श्रेय भाऊरावांनाच दिले होते. म्हैसकरांबरोबर त्यांचे बुद्धिबळाचे अनेक डाव रंगायचे. १९७९ मध्ये त्यांच्या नूतन बुद्धिबळ मंडळाने केवळ महिलांची बुद्धिबळ स्पर्धा भरवली होती. भारतातल्या १४ राज्यांच्या ४४ महिलांनी त्या स्पर्धेत भाग घेतला होता. नूतन बुद्धिबळ मंडळाची भाग्यश्री साठे त्या स्पर्धेत चौथ्या क्रमांकावर आली, पण तिने पुढे अनेक बडय़ा बडय़ांचे विक्रम मोडीत काढले. ती आशियाई विजेती ठरली. तिने इंग्लंड, फ्रान्स, पोलंड, स्वित्र्झलड, बांगलादेश आदी देशांमधल्या स्पर्धा गाजवल्या. भाऊरावांचे वैशिष्टय़ असे की, एखादी गोष्ट मनावर घेतली की तिचा पिच्छा पुरवायचा. आठ वर्षांखालील मुलांना लवकर बुद्धिबळ समजू शकेल, असे त्यांच्या मनाने घेतले आणि आश्चर्य म्हणजे त्यांची ती स्पर्धा कमालीची यशस्वी झाली. मग त्यांनी ८, १०, १२, १४, १६ आणि १९ वर्षे वयोगटाखालच्या स्पर्धा भरवून त्या यशस्वी करून दाखवल्या. इंग्लंडमध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेणारे विनायकराव खाडिलकर हेही नूतन बुद्धिबळ मंडळाचे खेळाडू. शिवराम नातू, आप्पाकाका खाडिलकर, नारायणराव खाडिलकर हे सगळे भाऊरावांच्याबरोबर खेळात रंगलेले दिसायचे. यात आणखीही एक नाव असे. पुढे राजकवी साधुदास म्हणून प्रसिद्धीस आलेले गोपाळराव मुजुमदारही त्यांच्या या ‘डावा’त असत. भाऊरावांच्या शब्दाखातर अनेक ग्रँडमास्टरही नूतन बुद्धिबळ मंडळाच्या स्पर्धेत दिसायचे. ‘६४ घरांचा राजा’ असे ज्याचे वर्णन केले जाते तो ग्रँडमास्टर विश्वनाथ आनंद सांगलीत खेळला आहे. अभिजित कुंटे, प्रवीण ठिपसे, देवेंद्र बारुआ, रविशेखर, जयश्री आणि रोहिणी खाडिलकर यांनीही सांगलीच्या त्यांच्या स्पर्धामध्ये हजेरी लावली आहे. त्यांच्या स्पर्धामध्ये अलीकडच्या काळात बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ या शेजारी देशांमधल्या खेळाडूंनीही सहभागी व्हायची इच्छा प्रदर्शित केली होती. स्पर्धाच्या तारखा जाहीर झाल्या, की भाऊरावांची स्वारी दौऱ्यावर निघे आणि देणगीदारांचा शोध घेत असे. त्यांनी आपल्या मंडळाकडे कायमस्वरूपी निधी राहील, असे पाहिले, पण क्रिकेटवर सर्वाधिक प्रेम करणारे बडे उद्योजक बुद्धिबळाचे नाव काढले, की ‘पुन्हा केव्हातरी पाहू’ म्हणून त्यांना वाटेला लावत. अशाने ते निराश मात्र होत नसत. वडील तम्मण्णाचार्य यांच्याकडून बुद्धिबळाचा आलेला वारसा सर्व समाजांपर्यंत पोहोचायला पाहिजे, या उर्मीतून ते ठाम असत. त्यांच्या कोशात ‘थकणे’ हा शब्दच नव्हता. सुट्टीच्या काळात शिक्षणसंस्थांच्या सभागृहात ते या स्पर्धा भरवायचे. त्यांना आपल्या मंडळासाठी मोठे सभागृह आणि संग्रहालय उभारायचे होते. स्वित्र्झलडमध्ये लुझानला असलेल्या ऑलिम्पिक संग्रहालयाच्या धर्तीवर त्यांना बुद्धिबळाची ही वास्तू उभारायची होती. त्यासाठी त्यांनी नामांकित वास्तूविशारदांबरोबर चर्चाही केली होती. सांगलीत त्यांना त्यासाठी उत्तम अशी जागा मिळाली, पण त्या जागेवर एका राजकारण्याचा डोळा असल्याने ही जागा देता येऊ शकत नाही, असे सांगत आताच्या सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेने ती द्यायला नकार दिला. भाऊराव पडसलगीकरांचे एक स्वप्न भंगले. वयाच्या सहाव्या वर्षांपासून बुद्धिबळात रंगलेला बुद्धिबळाचा हा भीष्माचार्यही आता उरलेला नाही. शिवछत्रपती क्रीडा कार्यकर्ता, पुढे ‘दादोजी कोंडदेव’ आणि अगदी अलीकडे ‘जीवन गौरव’ पुरस्कार देऊन महाराष्ट्र शासनाने गौरवलेला हा बुद्धिबळ तपस्वी बुद्धिबळाच्या वास्तूसाठी जागेच्या शोधात हिंडत होता. आता कुणी जागा देईलही, पण भाऊराव पडसलगीकर नावाचे धुरंधर व्यक्तिमत्त्व ती ताब्यात घेऊन स्पर्धा भरवायला नसेल, हा दैवदुर्विलास आहे. केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री प्रतीक पाटील सांगलीचे आहेत. त्यांनी आता या कामात पुढाकार घेऊन भाऊरावांच्या स्मृती चिरंतन राहतील, हे किमान पाहावे.

No comments:

Post a Comment