Thursday, April 15, 2010

रिलॅक्‍सेशनसाठी काही टिप्स
संगणकावर काम करण्याची गरज आज प्रत्येकालाच आहे. आधुनिकतेशी संबंध जोडण्यासाठी दैनंदिन व्यवहारात त्याची आवश्‍यकता असते. मात्र, सततच्या संगणकाच्या वापरापासून होणारे धोके टाळण्यासाठी प्रत्येकाने काळजी घेणेही आवश्‍यक आहे. संगणकाच्या मॉनिटरमधून विशिष्ट प्रकारचे किरण बाहेर पडत असतात, त्याकडे सतत पाहिल्याने डोळ्यांना त्रास होतो. मात्र कामाच्या ओघात संगणकाचे काम काही क्षण बाजूला ठेवण्याचे भान राहत नाही. त्याचा डोळ्यांवर विपरीत परिणाम होऊ शकतो. यासाठी, संगणकावर सलग काम करायचे असेल, तर दर पंधरा मिनिटांनी मॉनिटरवरून नजर हटविणे आवश्‍यक आहे. काही काळ डोळे बंद ठेवून डोळ्यांना आराम द्यावा. थंड पाण्याचा हलका शिडकावाही दिवसभराच्या ताणातून मुक्ती देऊ शकतो. मॉनिटरचा प्रकाशही डोळ्यांना कमीत कमी त्रास होईल, अशा रीतीने करून घेणे चांगले. फक्त संगणकावर काम करण्यासाठीचे खास चष्मेही मिळतात, त्यांचाही वापर करता येईल. डॉक्‍टरांच्या सल्ल्याने अशा गोष्टी केल्यास डोळ्यांचे आरोग्य चांगले राहून ताणमुक्तीला मदत होईल आणि रोजच्या कामातला उत्साहदेखील वाढेल.संगीत ऐका मस्तरिलॅक्‍स व्हायचं असेल तर संगीत ऐकण्यासारखा छान उपाय नाही. हे संगीत टीव्हीवर पाहण्यापेक्षा ते ऐकतऐकत काम करणं जास्त रिलॅक्‍स करतं. त्यामुळे तुमच्या घरच्या रेडिओवरची किंवा म्युझिक प्लेअरवरची धूळ झटका आणि या संगीत-उपचारांची मजा घ्या. संगीत मनावरचा ताण हलका करतंच; पण आपलं आवडतं गाणं, आवडतं वाद्यसंगीत ऐकलं, की काम करण्याचा उत्साह वाढतो. अर्थात संगीत ऐकताना काही गोष्टी पाळल्या पाहिजेत. सकाळी, दुपारी आणि रात्री त्या त्या प्रहराचा मूड ओळखून तशा प्रकारचं संगीत ऐका. रात्री झोपण्यापूर्वी ढॅणढॅण संगीत ऐकलं, तर झोप उडून जाईल, त्यामुळे त्या वेळी शांतच संगीत ऐकलं पाहिजे आणि सकाळी आवरतानाच्या वेळी मस्त उडत्या चालीची गाणी ऐका, म्हणजे कामं भराभर उरकतील आणि उत्साह वाटेल. संगीत ऐकताना त्याचा आवाज फार मोठा ठेवू नका, ते ऐकताना एकाच प्रकारचं संगीत ऐकण्यापेक्षा त्यात वैविध्य आणा, म्हणजे कंटाळा येणार नाही. ऑफिसमध्ये काम करतानाही बारीक आवाजात संगीत ऐकलं, तरी काम करताना फ्रेश वाटेल. टीव्ही बघण्यापेक्षा संगीत ऐकणं केव्हाही चांगलंच.

Sunday, April 4, 2010

बांधिलकी मानणारी लावणीसम्राज्ञी
संजय शिंदे
यमुनाबाई वाईकर यांनी नव्वदी पार केली असली तरी कलेसाठी आजवर व्यतीत केलेल्या आयुष्याचा सारा पट लख्खपणे त्यांच्या डोळ्यापुढे आहे. शरीर थकले तरी आवाजातील ठसका कायम. त्यामुळेच आजही लावणीचा विषय निघाला की त्या भरभरुन बोलतात. त्यांना नुकताच निळू फुले सन्मान पुरस्कार जाहीर झाला. त्यानिमित्ताने त्यांची भेट घेतली, तेव्हाही याचा प्रत्यय आला. ""निळूभाऊंचे माझे स्नेहाचे नाते होते. वाईत आल्यावर ते आवर्जून मला भेटायला येत होते. त्यांच्या नावाचा पुरस्कार मला महत्त्वाचा वाटतो,'' अशी भावना त्यांनी व्यक्त केली. वर्षानुवर्षे उपेक्षित राहिलेल्या कोल्हाटी- डोंबारी समाजात जन्मलेल्या यमुनाबाईंना परिस्थितीमुळे तमाशाकडे वळावे लागले; मात्र, गरिबीशी झगडत त्यांनी मोठ्या जिद्दीने आपले कर्तृत्व घडविले. सौंदर्य, अदाकारी व सुरेल आवाजाच्या देणगीमुळे त्यांनी मराठी लावणीच्या इतिहासात आपल्या कर्तृत्वाचा झेंडा सातासमुद्रापार फडकावला आहे. बालघाटी, छक्कड, चौकाची लावणी असे प्रकार त्या सादर करीत. बैठकीच्या लावणीला त्यांनी मोठा लौकिक मिळवून दिला. चौकाची लावणी ही त्यांची खासीयत होती. "का हो डोळे घालता सख्या', "सोडा मनगट हात तुटेल' अशा त्यांच्या लावण्या आजही रसिकांच्या ओठावर आहेत. यमुनाबाईंनी आयुष्यभर लावणी जिवंत ठेवली. पोटासाठी त्यांनी हा व्यवसाय स्वीकारला असला तरी या क्षेत्रात त्यांनी मोठे नाव कमवूनही त्यांच्या वागण्या-बोलण्यात त्याचा अजिबात लवलेशही जाणवत नाही. त्यांचे आपुलकीने बोलणे व वागण्यातील कमालीचा साधेपणा जाणवल्याशिवाय राहत नाही. यमुनाबाईंच्या तमाशा व लावणी क्षेत्रातील दखल घेऊन राज्य सरकारने त्यांना लावणीसम्राज्ञी पुरस्काराने सन्मानित केले. 1994 मध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले. तसेच महाराष्ट्र गौरव पुरस्कार, अखिल भारतीय जागतिक परिषद पुरस्कार आदी विविध पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. त्यांच्या लावण्यांवर अभ्यास करून अमेरिकेतील एका विद्यार्थिनीने डॉक्‍टरेट मिळविली आहे. तसेच लावणीवर तयार झालेला ग्रंथ कॅलिफोर्निया विद्यापीठात अभ्यासासाठी ठेवण्यात आला आहे. हा त्यांच्या कलेला मिळालेला मानाचा मुजरा आहे. कलाकार म्हणून त्यांचे वेगळेपण आहेच. मात्र, सामाजिक बांधिलकी जपण्यातही त्या मागे नाहीत. वाईत कोल्हाटी समाजासाठी घरे बांधण्यासाठी पुढाकार घेऊन त्यांची भटकंती थांबवली. त्याचप्रमाणे अखिल महाराष्ट्र कोल्हाटी समाज संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा घेऊन समाज व्यसनमुक्त होऊन शिक्षणाकडे वळावा, यासाठी मोठी धडपड केली. त्यांच्या या धडपडीला आता यश मिळू लागले आहे.महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीने नुकत्याच मुंबईत झालेल्या कार्यक्रमात त्यांना मानपत्र व गौरववृत्ती देण्यात आली. वयाच्या नव्वदीतही या कार्यक्रमास त्या उपस्थित राहिल्या होत्या. आता दगदग सहन होत नाही, अशी भावना त्यांच्या बोलण्यातून जाणवते. रसिकांनी भरभरून दिलेल्या प्रेमाबद्दलची कृतज्ञता त्यांच्या डोळ्यातून ओसंडून वाहते.

Wednesday, March 17, 2010

माणुसकीची मिणमिणती पणती
फादर फ्रान्सिस दिब्रिटो

समाजजीवनाचे भ्रष्टीकरण होत आहे. झटपट पैसे कमावण्याच्या शर्यतीत सारे उतरले आहेत. या स्पर्धेत माणुसकी आणि मूल्ये यांचा बळी पडत आहे. तरीही वाऱ्यावादळाशी आणि पाऊसपाण्याशी झुंज देत एखादी पणती मिणमिणत असते. तीच मानवतेची तारणहार ठरत असते.कोल्हापूरचा कार्यक्रम संपवून पुण्याला आलो. थोडा लवकर पोचलो. हिवाळ्याचे दिवस होते. अंधार रेंगाळत होता आणि गार वारे बोचत होते.बाहेर पडलो. "भाऊ, कुठे जायचे आहे?'' एकामागून एक रिक्षाचालक विचारत होते. "नारायण पेठ पोलिस चौकी,' असे सांगताच रागाचा कटाक्ष टाकून खांदे उडवत दुसऱ्या गिऱ्हाइकाकडे ते धावत होते.तिथे काही बायाबापड्या होत्या. लेकुरवाळ्या होत्या. त्यांच्या हातात वजनी पिशव्या होत्या. नाना-नानी होते; पण जवळचे भाडे घेण्यास कोणीच तयार नव्हते. आचार्य अत्रे यांनी नवयुग पाठमालेत पुणेरी टांगेवाल्यांविषयी लिहिलेली गोष्ट आठवली. त्यानंतर मुळामुठेतून कितीतरी पाणी वाहून गेले आहे. पुण्याचे स्वरूप पार बदलून गेले आहे. आर्थिक सुस्थिती आली आहे. शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात पुण्याने फार मोठा पल्ला गाठला आहे. स्वरूप बदलले; पण त्याबरोबर साऱ्याच सवयी बदलल्या असे नाही. इंग्रजीत एक म्हण आहे- ओल्ड हॅबिट्‌स डाय हार्ड!एक रिक्षा आली. रिक्षाचालकाला विनंती केली. "बसा भाऊ,'' तो प्रेमाने म्हणाला. त्याने मीटर सुरू केले आणि मगच विचारले, ""कुठं जायचं आहे?''"भाऊ, इथं इतके रिक्षावाले आहेत; पण कुणीच का येत नाही गावात?''"आहो, ही बोहनीची वेळ. रामप्रहरी तरी कुणाला काही सांगू नये. माशा मारत बसतील; पण जवळचं भाडं करणार नाहीत. त्यांना लांबची भाडी हवी आहेत. तीही मीटर न लावता. प्रसंगी दोन-अडीचशे रुपये मागतात. लोक अडलेले असतात हो. एकाच मार्गावरून जायचं असलं, तरी दोघातिघांना एकत्र कोंबून प्रत्येकाकडून पैसे उकळतात...'' तो बोलतच होता. जातीबरोबर माती खावी, असे म्हणतात. सारेच आपल्या व्यवसाय बंधूंना सांभाळून घेत असतात. त्या पार्श्‍वभूमीवर त्याचा परखडपणा पाहून मी भारावलो."बाबा आढाव माझे मित्र आहेत. त्यांना मी या अडवणुकीबद्दल सांगणार आहे.''"तो देवमाणूस आमच्यासाठी खूप झटतो; पण ते तरी काय करणार? प्रत्येकासोबत एखादा पोलिस देणार का?''"समोर ट्रॅफिक पोलिस आहेत. ते का प्रवाशांच्या मदतीला धावत नाहीत? मुंबईत दादरला किंवा विमानतळावर अशा नाठाळांना पोलिसांच्या दंडुक्‍यांचा प्रसाद मिळतो.'' मी.माझ्याकडे वळून पाहत तो म्हणाला, ""आहो, इथंच घोडं पेंड खातं. त्यांचं एकमेकांशी संगनमत असतं. काहीच करणार नाहीत पोलिस...''"आमचं पोट रिक्षावर अवलंबून आहे. मेहनत केली आणि सच्चाईनं वागलो, तर चार पैसे मिळतात. मोठमोठी दुकानं आहेत, मॉल आहेत. तिथं गिऱ्हाईक येतं. घासाघीस करतं. सौदा पटला नाही, तर निघून जातं. आमच्या धंद्याचं तसं नाही. रिक्षाची चाकं रस्त्याला लागली रे लागली, की आमची कमाई सुरू होते. आणि हे बघा साहेब, हे लोक अव्वाच्या सव्वा भाडं आकारतात. अडवणूक करून प्रवाशांना लुबाडतात; पण हा सारा पैसा घरी जातो का?'' तो बोलतच होता."कुठे जातो?'' मी विचारले."काय सांगू तुम्हाला? तुम्हीच समजून घ्या. घामाचाच पैसा आपल्या घरी येतो. हरामाच्या पैशाला वेगवेगळ्या सतरा वाटा फुटतात,'' तो तत्त्वज्ञान सांगत होता.दरम्यान, आम्ही "स्नेहसदन'च्या दारात पोचलो. रिक्षाचालक, पोस्टमन, बस कंडक्‍टर आदींच्याबाबत मला विशेष प्रेम वाटते. इतरांप्रमाणे त्यांच्याकडे "जादा' कमाईचे मार्ग नसतात. त्यांना बक्षिसी देण्यात आनंद वाटतो. मी त्याला भाड्यापेक्षा थोडे जास्त पैसे दिले. त्याने ते परत केले."दादा, नाव काय तुमचे? बोलण्याच्या ओघात विचारायचे राहून गेले.'' मी."अब्दुल्ला,'' तो."इतकं सुंदर मराठी बोलता तुम्ही?''"साहेब, मराठी माझी मायबोली आहे. पुण्यातच माय मराठीच्या अंगाखांद्यावर वाढलो...''"पोटाची खळगी भरण्यासाठी खूप खटपटी, लटपटी केल्या. शेवटी ही रिक्षा भेटली. गिऱ्हाईक माझं दैवत आहे. मी कोणालाही कधीही नाही म्हणत नाही. चार पैसे खिशात पडतात. संसाराचा गाडा हाकता येतो. प्रामाणिकपणे कष्ट केले, तर अल्लाह नाही ठेवत उपाशी.'' निघताना तो म्हणाला.त्याचा नितळ, पारदर्शी स्वभाव, गिऱ्हाइकाबद्दल वाटणारा जिव्हाळा आणि मायमराठीवरील प्रेम पाहून मी अचंबित झालो. मी त्याला न्याहारीसाठी येण्याचा आग्रह केला; पण हातची गिऱ्हाइके जातील, म्हणून त्यानं नम्रपणे नकार दिला. समाजजीवनाचे भ्रष्टीकरण होत आहे. झटपट पैसे कमावण्याच्या शर्यतीत सारे उतरले आहेत. या स्पर्धेत माणुसकी आणि मूल्ये यांचा बळी पडत आहे. तरीही वाऱ्यावादळाशी आणि पाऊसपाण्याशी झुंज देत एखादी पणती मिणमिणत असते. तीच मानवतेची तारणहार ठरत असते.

Monday, March 15, 2010

मनस्वी प्रतिभावंत

विनायक ऊर्फ विंदा करंदीकर हे एक विलक्षण व्यक्तिमत्त्व होते. कोणत्याही रुढ साच्यामध्ये ते बसणारे नव्हते.
याचे कारण कोणतीही चाकोरी आंधळेपणाने स्वीकारणे त्यांना मान्य नव्हते. त्यामुळेच ज्या काळामध्ये बा. सी. मढेर्कर यांच्या काव्यप्रतिभेचा आणि बुद्धिमत्तेचा दबदबा होता, त्याच काळात विकसित होत जाणाऱ्या विंदांनी आपल्या लेखनावर आणि शैलीवर कोणाचीही छाया पडू दिली नाही. सुरुवातीच्या काळामध्ये त्यांच्यावर माधव जूलियन यांचा प्रभाव होता; पण पुढे तोही ओळखू येणार नाही, अशी स्वतंत्र वाट विंदा करंदीकर यांनी निर्माण केली. स्वतंत्र प्रतिभा, तीक्ष्ण बुद्धिमत्ता, अफाट व्यासंग, कुतूहल वाटणाऱ्या विषयांमध्ये अधिकाधिक खोलवर जाऊन त्यांचा घेतलेला शोध आणि लावलेला अन्वयार्थ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ते मार्क्सवाद असा प्रवास करूनसुद्धा जपलेला मनाचा-विचाराचा मोकळेपणा ही त्यांची काही ठळक वैशिष्ट्ये होती. कोकणामध्ये जन्मलेल्या विंदांचे बालपण फारसे सुखाचे नव्हते. पण त्याचा त्यांनी बाऊ केला नाही किंवा भांडवलही केले नाही. प्राप्त परिस्थितीपुढे ते झुकले नाहीत आणि चांगले दिवस आल्यानंतरही त्यांचे जमिनीवरचे पाय सुटले नाहीत. एकंदरच विंदा आयुष्य घट्टपणाने जगले. सामाजिक बांधिलकी या शब्दाचा सतत जप न करतासुद्धा अशी बांधिलकी जपता येते, हे त्यांनी दाखवून दिले. त्यांच्या स्वभावात एक रोखठोकपणा होता आणि कोकणी माणसाकडे असणारा फटकळपणाही होता. पण विंदांचे हे रूप फणसासारखे होते. विंदांचे मन अतिशय संवेदनशील होते. लहान मुलाचे भावविश्व जाणून घेण्याची त्यांची शक्ती अचाट होती. त्यामुळेच त्यांनी मुलांसाठी विपुल लेखन केले. त्यांच्या 'एटू लोकांचा देश'ने तर पिढ्यानुपिढ्यांचे रंजन केले. विस्मयकारक कल्पना, हळुवार मनामध्ये अलगदपणाने प्रवेश करण्याची किमया, साधे-सरळ शब्द आणि प्रसन्न शैली यामुळे त्यांनी बालवाचकांसाठी एक आगळे दालनच खुले करून दिले. असे दालन की ज्यामध्ये ऋजुता जपलेल्या कोणत्याही वयाच्या वाचकाने सहजपणे शिरून आनंदित होऊन जावे. अशी किमया करणाऱ्या विंदांनीच सामाजिक वास्तव मांडणाऱ्या कविताही लिहिल्या. व्यक्तिगत भावजीवनाचेही चित्रण केले आणि जीवनातील अटळ सत्यही सांगून टाकले. या लेखनाने त्यांना उदंड प्रसिद्धी मिळाली. विंदा करंदीकर, वसंत बापट आणि मंगेश पाडगावकर यांच्या कवितावाचनाच्या कार्यक्रमांनी साऱ्या महाराष्ट्राला वेड लावले. पण विंदांची प्रतिभा कवितेतच अडकून पडली नाही. त्यांच्या लेखणीने लघुनिबंधही लिहिले. या निबंधांमध्येही विदांची विचारशक्ती किती वेगळ्या प्रकारे काम करत होती, याचेच दर्शन होते. 'पहिला पाऊस' या निबंधामध्ये साचेबद्ध चित्रण नाही. ते म्हणतात, 'पावसाविषयी मी विचार करू लागलो की मला न कळताच एका अज्ञात भूतकालाकडून माझे मन पछाडले जाते. पृथ्वीवर पडलेला तो पहिला पाऊस मला आठवतो; त्याचे लिंबाएवढे थेंब डोळ्यांसमोर गरगरू लागतात. लाव्हाच्या लाटांशी चालणारा त्याचा भयानक संघर्ष डोळ्यांसमोर तांडव करू लागतो. पृथ्वीवरचा तो पहिला पाऊस!' असे चकित व्हायला लावणारे, वेगळाच दृष्टिकोन मांडणारे, विचारांना नवीन दिशा देणारे, चाकोरीबाह्य विश्वाचा एक कोपरा उघडून दाखविणारे लेखन हाच विंदांचा विशेष होता. याच विशेषातून त्यांनी अॅरिस्टॉटलचे काव्यशास्त्र लिहिले, शेक्सपिअरच्या 'किंग लिअर'चे भाषांतर केले. हे करण्यामागे 'जगातील मौलिक ग्रंथ मराठीत आणून मराठी समृद्ध करणे आणि उच्च शिक्षणाचे माध्यम होण्याचे तिचे सार्मथ्य वाढवणे, ही कर्तव्यनिष्ठ प्रेरणा होती' असे विंदांनीच नमूद केले आहे. अशा अंगाने ग्रंथलेखन करणाऱ्या विंदांनीच तत्त्वज्ञानाच्या ओढीतून ज्ञानेश्वरांच्या अमृतानुभवचे अर्वाचिनीकरण केले. ते पूर्ण झाले, १९७८ सालामध्ये. त्याच्यापुढचेच वर्ष अल्बर्ट आइन्स्टाईनच्या जन्मशताब्दीचे वर्ष होते. जगाच्या विचारविश्वामध्ये घुसळण करून विज्ञानाला नवा आयाम प्राप्त करून देणाऱ्या या संशोधकाला विंदांनी आपला 'अमृतानुभव' ग्रंथ अर्पण केला. विज्ञानाबद्दलची अशी ओढ हासुद्धा विंदांचा विशेष होता. अशा ओढीतून त्या विषयाचे अभ्यासपूर्ण वाचन करणारे तत्त्वज्ञानाकडे अधिकच ओढले जातात. अलीकडे विंदाही चार्वाकपासून ते देकार्तपर्यंतच्या तत्त्वज्ञांकडे असेच वळले. हे तत्त्वज्ञ आणि त्यांचे विचार यांची ओळख करून देण्यासाठी त्यांनी 'अष्टदर्शने' लिहिली. याचा अर्थ वाढत्या वयाने त्यांच्या मनातील कुतूहलाला संपवले नव्हते आणि सरत जाणाऱ्या वर्षांनी त्यांच्या मनातील सजगता लोपली नव्हती. त्यामुळेच कबीर सन्मानापासून ते ज्ञानपीठापर्यंतच्या सन्मानांची रक्कम त्यांनी सामाजिक कार्यासाठी देऊन टाकली. 'देणाऱ्याने देत जावे। घेणाऱ्याने घेत जावे। घेता घेता एक दिवस। देणाऱ्याचे हात घ्यावेत।। असे सांगणाऱ्या विंदांनी आपल्या साहित्यातील शब्द कागदापुरतेच राहणारे नाहीत, हे सप्रमाण दाखवून दिले. त्यांच्या निधनाने प्रगल्भ प्रज्ञेचा उत्कट आणि मनस्वी प्रतिभावंत आपण गमावला आहे.
तत्त्वज्ञ कवी
रस्त्याच्या दोन्ही बाजूंना स्वप्ने उधळीत, गेलो झेपावत भविष्याच्या दिशेने घेऊन अगोदरच अटळाचे दर्शन, असे म्हणणारे विंदा आता दर्शनापार गेले आहेत. केशवसुत, माधव जूलियन, बा. सी. मर्ढेकर, विंदा करंदीकर, नारायण सुर्वे या शृंखलेतील विंदा करंदीकर नावाची एक कडी अलगदपणे गळून पडली आणि या सामाजिक जाणिवेचा एक काव्यमय दुवा कायमचा हरपला. प्राध्यापक गोविंद विनायक तथा विंदा करंदीकर हे कवी म्हणून सर्वज्ञात असले तरीही इंग्रजीचे गाढे व्यासंगी प्राध्यापक, लघुनिबंधकार, साहित्यशास्त्राचे अभ्यासक, उत्तम भाषांतरकार आणि समीक्षक म्हणूनही खूप मोठे होते आणि त्याच्याही पलीकडे माणुसकीचे पूजक, तत्त्वज्ञ, स्वच्छंदी शैली जपणारे चिंतक म्हणूनही त्यांचे आगळेपण सांगता येईल. विंदांच्या जाण्यामुळे व्यवहारात चिक्कू म्हणून ओळखला जाणारा; पण वास्तवात आभाळाएवढा दानशूर असा माणूस आपल्यातून कायमचा गेला आहे. दैनंदिन जगण्यात पै-पैची बचत करणारा हा माणूस आपल्याला मिळालेली सारी संपत्ती सार्वजनिक क्षेत्रात चांगले काम करणाऱ्या संस्थांमध्ये आनंदाने वाटून टाकताना सतत दिसला आहे. एका बाजूला साहित्यनिर्मिती करत असताना सामाजिक बांधिलकी जपण्याचे त्यांचे वैशिष्ट्य आगळेच म्हणावे लागेल. त्यामुळेच भागानगर सत्याग्रहात मिळालेली कारावासाची शिक्षा त्यांनी आनंदाने सोसली आणि एका विशिष्ट टप्प्यानंतर सारे सन्मान त्यांचा पाठलाग करत असतानाही जाणीवपूर्वक वानप्रस्थाश्रम स्वीकारण्याची कृती त्यांनी करून दाखवली. अर्थात असे हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व असले तरीही त्यांच्यातला कवी सर्वांत आघाडीवर होता, हेही खरेच. त्यांची मुख्य ओळख त्यामुळेच कवी अशीच राहील. "नव्या मनूतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे; कोण मला वठणीला आणू शकतो तो मी पाहे' म्हणणाऱ्या केशवसुतांची, "मराठी असे आमुची मायबोली, जरी आज ही राजभाषा नसे; नसो आज ऐश्‍वर्य आज या माउलीला, यशाची पुढे दिव्य आशा असे' असे सांगणाऱ्या माधव जूलियनांची आणि "गणपत वाणी बिडी पिताना चावायचा नुसतिच काडी; म्हणायचा अन्‌ मनाशीच की या जागेवर बांधिन माडी' असे म्हणणाऱ्या बा. सी. मर्ढेकरांची परंपरा पुढे नेताना "देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे' असे म्हणणारे विंदा आज आपले दाते हात आणि माणसाच्या जगण्याचे लेखनातून आलेले निधान आपणा सर्वांसाठी मागे ठेवून आपल्यातून निघून गेले आहेत. वि. स. खांडेकर आणि कुसुमाग्रज यांच्यानंतर ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे मराठी साहित्यिक म्हणून असलेली विंदांची ओळख अखिल भारतीय पातळीवर श्रेष्ठ साहित्यिक म्हणून असली तरीही त्यांच्यातला माणूस हा त्यांना मिळालेल्या साऱ्या पुरस्कारांपलीकडचा एक निखळ तत्त्वज्ञ होता. मात्र त्यांनी स्वतःकडे कधीही असे थोरपण असल्याचे मिरवले नाही. पण दिलीप पुरुषोत्तम चित्र्यांसारख्या कवींनाही ते सतत आदर्श बनून राहिले होते, यातच त्यांचे मोठेपण स्पष्ट होते. त्यांच्या कवितेत माणसाच्या जगण्याचे भलेबुरे सारे पदर एकवटलेले होते. "अष्टदर्शने'सारख्या काव्यकृतीने त्यांनी जागतिक तत्त्वज्ञानाचे भांडार मराठी माणसाला खुले केले. तसेच त्याच माध्यमातून चार्वाकाचे अस्सल दर्शन घडवीत ज्ञानेश्‍वरांच्या अमृतानुभवाचेही आजचे विश्‍लेषण वाचकांसमोर ठेवले. चार्वाकाबद्दल आपल्या कवितेत ते म्हणतात, "चार्वाकप्रणित । सुखवाद काही, अयोग्य ते नाही । सुचवीत. सुखी होण्यासाठी। करावे काहीही, असे त्याने नाही। सांगितले. सुखासाठी चौर्य । वा मद्यप्राशन, चार्वाक-दर्शन । सुचवी ना.'' थोडक्‍यात सत्याचा स्वीकार आणि श्रद्धांचा अव्हेर तसेच हिंसेचा धिक्कार करून मानवी जीवन सुखमय करणे, हेच एक ध्येय मानणारे उद्योगप्रवण मानवतावादी असे चार्वाकाचे दर्शन ते घडवतात. आपल्या "अष्टदर्शने'त त्यांनी देकार्त, स्पिनोझा, काण्ट, हेगेल, शोपेनहौएर, नित्शे, बर्गसॉं यांच्यासह चार्वाकाच्या तत्त्वज्ञानाची काव्यमय ओळख करून दिली. यातील चार्वाक वगळता, सारेच तत्त्वज्ञ प्रत्यक्ष हे एकमेव प्रमाण न मानणारे आहेत. मात्र चार्वाक हा प्रत्यक्ष हेच प्रमाण मानणारा. या सर्व तत्त्वविचारांची सांगड घालण्याचे काम त्यांनी या "अष्टदर्शने'च्या माध्यमातून का केले, असा प्रश्‍न समोर येऊ शकतो. परंतु शि. स. अंतरकरांनी प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे विश्‍व आणि मानव यांच्या अस्तित्वाच्या स्वरूप आणि अर्थविषयक मूलभूत प्रश्‍नांचा शब्दप्रामाण्य न स्वीकारता केला जाणारा विचार म्हणजे तत्त्वज्ञान, हे समान सूत्र त्यामागे आहे. या साऱ्यातून कोणत्याही जगण्याच्या पातळीवर अंधानुकरणापेक्षा विचारगर्भ वृत्तीचा अंगीकार करण्याचे तत्त्व त्यांनी मांडले, हे लक्षात येते. म्हणूनच हा कवी केवळ काव्याच्या सौंदर्यासक्ततेचा भक्त न राहता, जीवनाच्या सौंदर्याचाही भाष्यकार ठरतो. स्वातंत्र्यवीर सावरकरांची कविता जशी हेतुगर्भ होती, तशीच हेतुगर्भता विंदांकडे होती आणि तरीही निव्वळ हेतुगर्भ कवितेचे लेखन त्यांनी केलेले नाही, हेही महत्त्वाचे आहे. विंदांनी स्वेदगंगा, मृद्‌गंध, ध्रुपद, जातक आणि विरुपिका या क्रमाने आपले रस्त्याच्या दोन्ही बाजूंना स्वप्ने उधळीत, गेलो झेपावत भविष्याच्या दिशेने घेऊन अगोदरच अटळाचे दर्शन, असे म्हणणारे विंदा आता दर्शनापार गेले आहेत. काव्यसंग्रह प्रकाशात आणले. अनुभवाशी इमान राखणे आणि भाषेच्या रूढ वाटा टाळणे, ही त्यांच्या कवितेची खास वैशिष्ट्ये. सत्याचा शोध ही या सगळ्या कवितेमागची अंत:प्रेरणा असल्याचे दिसून येते. मात्र त्यामुळेच इंद्रियनिष्ठ अनुभवांनाही ते "प्रेम करावे शुद्ध पशुसम' अशा शब्दांनी सामोरे जाऊ शकले. हे करत असतानाच बालकविता, लघुनिबंध, समीक्षा हे प्रांतही त्यांनी ताकदीने हाताळले. "ऍरिस्टॉटलचे काव्यशास्त्र', "फाऊस्ट', किंवा "राजा लिअर' सारखी त्यांची ग्रंथावरील टीकेसह केलेली भाषांतरे त्यांच्या व्युत्पन्नतेची साक्ष देतात. त्यांच्या भाषेतील अभिनिवेश, नाट्य आणि ठामपणा त्यांच्या लेखनाला सौंदर्याबरोबरच एक काळीज कापणारी धारही प्रदान करतो. हे वैशिष्ट्य खास करंदीकरांचेच आणि म्हणूनच त्यांच्या लेखनाचा आकृतिबंधही खास त्यांचाच. व्यक्तिगत आणि सामाजिक अनुभव आवश्‍यक तेव्हा अंतर्मुख पद्धतीने आणि जरूर तेव्हा बर्हिमुख स्वरूपात मांडण्याची त्यांची हातोटी, ही त्यांचे व्यक्तिमत्त्व एकारलेले नसल्याचेच दाखवून देते. स्वतःच्या कवितांचे इंग्रजी अनुवाद करताना त्यांनी केलेले भाष्य हे ते स्वत:कडेही कसे अलिप्तपणे पाहू शकत होते, याचेच दर्शन घडवते. त्यांच्या बालकवितेत एक खट्याळ आजोबा दडलेले दिसतात. ही कविता साने गुरुजींसारखी भावुक आणि ध्येयवादी नाही. मात्र सहजसंवादी पद्धतीने मने जिंकत बालकांना आनंदाचे खजिने पुरवणारी आणि त्यातून नव्या विचारांची प्रेरणा देणारी म्हणून बघावी लागते. "अजबखाना', "एटू लोकांचा देश', "पिशीमावशी', "बागूलबोवा' सारखे त्यांचे संग्रह या दृष्टीने लक्षात घ्यावे लागतील. त्यांनी प्रेमकविता लिहिली तरी या प्रेमकवितेला रोमॅंटिसिझमचा वास नव्हता. किंबहुना स्त्रीबाबतची त्यांची करुणाच त्यांच्या कवितेतून जास्त ठळक झालेली दिसून येते. त्यांच्या कवितेत स्त्री आणि पुरुष यांच्यातील विरोध सातत्याने मांडला गेला आहे; मात्र त्यातला पुरुष स्त्रीपेक्षा नेहमीच खुजा आहे. स्वतः पुरुष असूनही हे वास्तव काव्यातून प्रकटणे हे त्यांची माणसाकडे पाहण्याची अलिप्ततावादी वृत्तीच दाखवते. "कर कर करा, मर मर मरा, दळ दळ दळा, मळ मळ मळा, तळ तळ तळा, तळा आणि जळा' असे म्हणत ते "भारतीय स्त्रियांसाठी स्थानगीत' या कवितेत स्त्रीच्या स्थितीवरती नेमकेपणाने बोट ठेवतात. बालकवितेतदेखील त्यांच्यातला तत्त्वज्ञ त्यांची पाठ सोडत नाही. "सून' ही त्यांची कविता त्या दृष्टीने बोलकी आहे. तीमध्ये ते म्हणतात, "एकदा कांद्याला म्हणाली लसूण, ""मला आण एक सून.'' मग कांदा बाजारात गेला, लवंग घेऊन घरी आला; लसूण म्हणाली "सून हुशार' लवंग झाली तिखट फार!'' जीवनातल्या वास्तवाची अशी पेरणी सहजगत्या करणे हे त्यांचे खास वैशिष्ट्य होते. मंगेश पाडगावकरांनी "संहिता - विंदा करंदीकरांची निवडक कविता' या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे, "पूर आलेल्या नदीचा प्रवाह काठ जुमानीत नाही,' अगदी अशाच प्रकारचे रांगडे चैतन्य, जोमदारपणा हे करंदीकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. जीवनाविषयीच्या जिवंत कुतूहलातून करंदीकर काव्याची प्रेरणा घेत असत. कुठल्याही अनुभवावर किंवा काव्यप्रकारावर शुद्ध कलात्मक किंवा अ-कलात्मक असा शिक्का मारायला ते तयार नसतात. करंदीकरांची खरी बंडखोरी त्यांच्या या मनमोकळ्या, कलात्म प्रतिष्ठेचे साचे झुगारू शकणाऱ्या स्वीकारशीलतेत आहे. अनुभवाचे सामर्थ्य आणि कलात्मक रचनेचे सौंदर्य यांच्या एकजीवतेतून निर्माण होणारी जाणीव करंदीकरांच्या कवितेला व्यापून राहिलेली आहे. सतत जाणवणाऱ्या नवनव्या सत्याच्या संदर्भात करंदीकर जुन्या निष्ठा उलटसुलट करून तपासून पाहतात. स्वतःच कवटाळलेल्या विचारधारेशी विरोध पत्करतात. त्यामुळेच "वर्तमानपत्रांनी सकाळी घातलेला आगीचा रतीब पितो घटाघटा आणि प्रायश्‍चित्त म्हणून फिरवतो बोटे मुलांच्या जावळातून' असे ते म्हणू शकतात. सत्यदर्शनासाठी नीती-अनीतीच्या सांकेतिक कल्पनांचा त्याग ते करतात. सत्याचा शोध घेताना होणारे जीवनाच्या विसंगतीचे दर्शन ते सर्वांपर्यंत पोचवतात आणि तर्कापलीकडच्या सत्याची वाटणारी ओढ ते तितक्‍याच स्पष्टपणाने समोर ठेवतात. त्यामुळेच "पांथस्थ पक्षी', "निळा पक्षी', "तसेच घुमते शुभ्र कबुतर' सारख्या त्यांच्या कविता वेगळी प्रतीके घेऊन विचार करायला भाग पाडतात. इंद्रियनिष्ठ अनुभव आणि आध्यात्मिक अनुभव यांत भिंत उभी न करणे हे करंदीकरांचे एक वैशिष्ट्य आहे. ऐंद्रिय अनुभव नाकारणारे अध्यात्म आपण मानत नाही, असे म्हणणारे करंदीकर शारीर अनुभवाची उत्कटता आध्यात्मिकतेला भिडवून परस्परविरोधी तत्त्वांमधली साम्यस्थळे शोधण्याचेही काम करतात. माणसाचे जगणे हे एकारलेले असूच शकत नाही. एकाच वेळी परस्परविरोधी स्वरूपाच्या अनुभवांच्या समग्रतेतून त्याचा प्रवास चालू असतो, हे अतिशय स्वच्छ मनाने करंदीकर सांगू शकतात. कारण ते स्वतःही त्याच स्वच्छ मनाचे आणि निर्मळ आचाराचे उद्‌गाते म्हणूनच ओळखले जातात. "ये यंत्रा ये' म्हणत यंत्रयुगाचे स्वागत करणारा हा कवी क्रांतीची चाहूल घेत "माझ्या मना बन दगड' असेही म्हणतो. वर्गसंघर्षाचे ढोल बडवतानाच नवसर्जनाचे न्यारे रूप ते आपल्यासमोर ठेवतात. कधी साम्यवादी वाटणारी त्यांची विचारधारा, व्यक्तिस्वातंत्र्याच्या गरजेपुढे बोथटपणा आला तरी हरकत नाही, असे म्हणताना दिसते आणि त्यामुळेच रिक्षाचे पैसे वाचवण्यासाठी चार किलोमीटर अंतर खांद्यावर फणसाचे ओझे घेऊन पार करणारा हा लेखक सार्वजनिक संस्थांना लाखो रुपयांची मदत अगदी सहजगत्या करताना दिसतो आणि देहदानाच्या माध्यमातून मृत्यूनंतरही आपले तत्त्व टिकवून ठेवतो. या दोन्ही भूमिकांत लोकांना विरोधाभास दिसला, तरी प्रत्यक्षात तात्त्विक एकतानता आहे, हेच सिद्ध होते. हे सत्य ज्याला उमगले तोच विंदांचे विचार खऱ्या अर्थाने पुढे नेईल.

Monday, March 8, 2010

"पुढारी' नको...!


"सकाळ'ने मध्यंतरी तबलानवाझ झाकीर हुसेन यांचा अत्यंत सुंदर कार्यक्रम घेतला. दुसऱ्यादिवशी कोल्हापुरातील एका सजग महिलेचा फोन आला, तो दोन कारणांसाठी. एक असे की इतका मोठा कलावंत "सकाळ' मुळे कोल्हापुरात आला, त्याबध्दल आभार आणि दुसरे असे की त्या कार्यक्रमात "सकाळ'ने एकाही राजकीय पुढाऱ्याला व्यासपीठावर येवू दिले नाही त्याबध्दल विशेष आभार. गेल्याच पंधरवड्यात देशातील सर्वात विश्वासार्ह व्यक्ती म्हणून ज्यांचा गौरव झाला ते माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुलकलाम यांचा कोल्हापूर दौरा झाला. त्या दौऱ्यातही केशवराव भोसले नाट्यगृहातील कार्यक्रमात त्यांनी "चांगला राजकीय नेता' व्हायला किती जणांना आवडेल असे विचारल्यावर कसाबसा एकाच मुलीचा हात वर गेला. सभागृहात चांगल्या शाळेतील उद्याचे भवितव्य म्हणता येतील अशी सातशे मुलं-मुली होती, त्यांतील फक्त एकाच मुलीस राजकीय नेता व्हावा, असे वाटावे, यातच राजकीय पुढारी या जमातीबध्दल समाजात किती खोलवर नाराजीची भावना आहे हे ध्यानात येवू शकेल.नगरसेवकांपासून आमदार-खासदारांपर्यंत बहुतेक राजकीय नेत्यांचे वागणे सारखेच असते, अशी समाजाची धारणाच बनली आहे. लोकांच्या घामातून उभ्या राहणाऱ्या संपत्तीवर हे लोक डल्ला मारतात आणि आपल्यासाठी कांहीच करत नाहीत असाही रोष वाढतो आहे. राजकीय पुढाऱ्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे आपल्या मुलाची संधी डावलली जाते असेही त्याला वाटते. दिलेला शब्द आणि वेळ कधीच न पाळणारा माणूस अशी राजकीय पुढाऱ्याची समानार्थी संज्ञा बनली आहे. आता राजकारणात येणारी पिढीही राजकीय पुढाऱ्यांच्याच घरांतील आहे. तिथेही सामान्य माणूस गावकुसाबाहेर. म्हणून राजकीय पुढारी होवून समाजसेवा करण्याचा विचार नव्या पिढीला खुणावत नाही. तेदेखील "करिअर' असू शकते असा तो विचारच करू शकत नाही. खरेतर आपल्या जगण्याशी संबंधित अनेक विषय ज्या व्यवस्थेशी संबंधित आहेत, त्या व्यवस्थेवर समाजाने दाखविलेला हा अविश्वास आहे.आपल्या देशाने राजकीय लोकशाही स्विकारली आहे. या लोकशाहीने सामान्य माणसाला अमुल्य असा मताचा अधिकार दिला आणि आपले राज्य कुणी करायचे हे ठरविण्याची ताकद दिली. परंतू ही ताकद अनेक कारणांनी दिवसेंदिवस क्षीण होत चालल्याचे चित्र दिसते. त्याचेच प्रतिबिंब व्यापक अर्थाने समाजमनांत उमटताना दिसते. त्यामुळेच राजकीय पुढारी व्हायला कुणाचे हात वर यायला तयार नाहीत, त्याचप्रमाणे विश्वासार्ह व्यक्ती म्हणून समाज त्यांना मान्यता द्यायला तयार नाही. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले अशी श्रध्दा बाळगणारा आपला समाज आहे. त्या श्रध्देला तडे गेल्यानेच लोकांची राजकारणाबध्दल नकारात्मक मानसिकता तयार होत आहे.त्यामुळेच सोनिया गांधीपेक्षा लोकांना डॉ.कलाम हे अधिक विश्वासार्ह वाटतात. कुठेही गेलो तरी लोकांना "पुढारी तेवढे नकोत.. अशी सार्वत्रिक चीड दिसते ती राजकीय नेतृत्वाला आत्मचिंतन करायला लावणारी आहे. - विश्वास पाटील

Tuesday, February 16, 2010

दु:खाचा शोध घेतलाच पाहिजे!
झेपावणाऱ्या पंखांना क्षितिजे नसतात. त्यांना फक्त झेपेच्या कवेत येणारे आकाश असते... उद्याच्या उड्डाणांचे आकाश पाहायचे असेल, तर नव्या पिढीने बदललेच पाहिजे. या बदलात सकारात्मकता हवी. बदलही विधायक हवेत. आपल्याला सुंदर जग हवे आहे ना; मग दुःखाचा शोध घेतला पाहिजे.काळ किती बदलतो बघा. परवा मी नागपुरात होतो. अर्थात, महत्त्वाच्या कामानिमित्तानेच गेलो होतो. अशोकवनात थांबलो होतो. सोबत गोपाळ फडणीसही होता. त्याचा भाऊ विवेक "व्हीसीए'चा सदस्य आहे. अनायसे भारत-दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट सामना सुरू होता. त्याने दोन तिकिटे दिली. आम्हाला थोडा वेळही होता. मंदाला खरेदीसाठी शहरात जायचे होते. मला त्या खरेदीत काही रस नव्हता. मी आणि गोपाळ सामना बघण्यासाठी जामठ्याच्या "व्हीसीए' स्टेडिअमवर गेलो. अगदी भोजनापर्यंतचा सामना बघून लगेच परतलोसुद्धा. "जंगलातून मैदानात' अशा फोटोओळींसह सामना बघतानाचे आमचे छायाचित्र वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले. फावला वेळ होता, म्हणून गेलो होतो. एरवी आमच्या वाट्याला असे वेळखाऊ मनोरंजन कधी आले नाही. एकतर हेमलकशात करमणुकीची साधने नव्हती. महाविद्यालयात असतानाही मी फारसा क्रिकेट वगैरे खेळलो नाही. कॉमेन्ट्री ऐकण्यापलीकडे माझे वेड पुढे गेले नाही. आमचा दुवाकॉलेज सुटले. मी इकडे आलो, तेव्हाही कॉमेन्ट्री ऐकणे कधीमधी सुरू होते. इकडे त्या काळात ना वृत्तपत्रे यायची, ना पुस्तके. जगाशी संबंधच नव्हता म्हणा ना! एकमेव ट्रान्झिस्टर होता. तो आमचा आणि जगातील दुवा होता. त्यावर आम्ही बातम्या ऐकायचो. स्थानिक स्टेशन्स खर्र-खर्र अशा आवाजासह ऐकावी लागायची. बीबीसी मात्र लागायचे. साधे आणीबाणीचेच उदाहरण घ्या. 26 जून 1975 ला लागू झालेली आणीबाणी आम्हाला कित्येक दिवस कळलीच नाही. प्रचंड पाऊस सुरू झाला असल्याने हेमलकशाचा उर्वरित भागाशी संबंध तुटला होता. मी बाप होणार होतो. मंदाची आबाळ नको म्हणून ताई तिला इथून घेऊन गेली होती. दिगंतच्या म्हणजेच पिलूच्या जन्माची बातमी नागपूरहून हेमलकशाला पोचायला महिना लागला. साक्षात बापालाच महिनाभरानंतर बातमी समजावी, असे तेव्हाचे अवघड दिवस होते. बाबांनी जगनला नेहमीप्रमाणे फोन केला होता. तो निघालाही; मात्र पावसाने सारे रस्ते अडवून ठेवले होते. तो तरी काय करणार?जन्मानंतर महिनाभरातच पिलूला डायरिया झाला. त्यामुळे जगन पुन्हा हेमलकशाला निघाला. माझ्या मुलाच्या जन्माची "बातमी' मला त्याच्या आजारपणामुळे महिनाभराने कळली. नाल्यानजीक जीप ठेवून जगन सायकलने हेमलकशात पोचला होता. निरोप कळल्यावर मी त्याच्यासह जीपशेजारी आलो. जीप दिसेचना. पाहतो तर नाल्याच्या प्रवाहात वाहून गेली होती. नेमका मोठा दगड आडवा आल्याने ती अडकून पडली. मग आम्ही हिकमतीने दगड काढला. बंद पडलेली जीप कशी तरी सुरू केली. पाणी ओसरल्यानंतर आनंदवनसाठी रवाना झालो. आम्ही पोचलो तोवर रात्र झाली होती. आज ते सारे दिवस आठवले, तरी अंगावर शहारे येतात. काहीही सुविधा नसताना साऱ्या हालअपेष्टा कशा सोसल्या असतील, याचे आश्‍चर्यही वाटून जाते. एकमात्र खरे, या साऱ्यांमागे प्रेरणा होती, उद्दिष्ट होते- जगाला सुंदर करण्याचे. आज विश्‍वासाने वावरणारे आदिवासी दिसले की खूप बरे वाटते. जग बदलले. खेड्यापाड्यात टीव्ही पोहचला. परवा क्रिकेट सामना बघून आल्यानंतर या सर्व गोष्टी आठवायला लागल्या. काम हाच विरंगुळा !तेव्हा एक बरे होते. कामे एवढी असायची, की फावला वेळ उरायचाच नाही. पेशंट नसताना मी दाट जंगलात जायचो. जळाऊ लाकडे आणावी लागायची. मी ट्रॅक्‍टर चालवायचो. बांधकामासाठी दगड आणावे लागायचे. मी एकटाच जायचो असेही नाही. आम्ही सर्व जण मिळून सारी कामे करायचो. दिवसभर कोणत्या ना कोणत्या कामात आम्ही सर्व गुंतलेलो असायचो. कामांनी थकल्यामुळे रात्री झोप यायची. तसे बऱ्यापैकी वाचनही चालायचे. त्या काळात गाजलेली पुस्तके मी वाचून काढली होती. हे कार्य चालायचे कंदिलाच्या प्रकाशात. लाइट नव्हतेच ना! सुटीचा वेळ मिळालाच, तर मी जंगलात भटकून यायचो. अगदी दूरवर चालत जाऊन अनेक व्यक्तींना भेटणे हा माझा छंद होता. तेवढाच विरंगुळा. मंदाला बागकाम आवडायचे. ती फळझाडे, फुलझाडांमध्ये रमायची. आदिवासींकडे धड कपडे नव्हते. साध्या लंगोटीवर ते राहायचे. माडिया फारसे कपडे घालायचे नाहीत. कमरेला फडके बांधले, की झाला त्यांचा पोशाख. लहान मुलांच्या अंगावर लंगोटसुद्धा नसायचा. तेव्हा सरकारची एक "जनता योजना' सुरू होती. 20 रुपयांत वस्त्रोद्योग महामंडळात जनता साड्या मिळायच्या. शंभराची साडी फक्त वीस रुपयांत मिळायची. मंदा या साड्या आदिवासींपर्यंत पोचवायची. स्वस्त कापड मिळाल्याने त्यांनाही ते परवडायचे. अशी काही कामे आम्ही वाटून घेतली होती. खरे सांगायचे तर, "रिकामे मन सैतानाचे घर,' या उक्तीप्रमाणे आम्ही स्वतःला सतत व्यस्त ठेवायचो. माझ्यासह सर्व मित्रांनी सर्व प्रकारची कामे केली आहेत. अगदी संडाससुद्धा साफ केले आहेत. तेव्हाचे संडास म्हणजे, खड्डा खोदून माती टाकायची पद्धत होती. कामाची लाज आम्ही बाळगली नाही. श्रमांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचा संकल्प केल्यानंतर कष्टसुद्धा हलके होऊन जायचे. आदिवासी उघडेनागडे राहायचे; पण त्यांचा प्रामाणिकपणा आम्हाला भावला होता. ते कष्टाळूही होते. हाफपॅन्ट हाच पोशाख !कॉलेजमध्ये असतानाही मी साधा शर्ट-पॅन्ट घालायचो. इथे आल्यावर पायजमा शर्ट घालायला लागलो. कुडकुडणाऱ्या थंडीत उघड्या शरीराने हिंडणारे आदिवासी बघून आपल्याला पूर्ण कपडे घालायला मिळतात, याचीही लाज वाटायची. तेव्हापासून मी हाफपॅन्ट आणि अर्ध्या बाह्यांचा बनियन वापरायला सुरवात केली. हाच माझा पोशाख झाला. बाहेर जायचे असेल तेव्हा फक्त पायजमा सदरा घालायचो. एरवी माझा हाफपॅन्ट-बनियनचा पोशाख ठरलेला असायचा. अगदी आजपर्यंत ती सवय कायम आहे. सगळेच कार्यकर्ते असे कपडे घालायचे. गरज नसलेल्या गोष्टी टाळायच्या, हे ठरवून टाकले. एकेक गोष्टी आपोआपच सुटत गेल्या. केसांना तेल लावणे बंद केले. कंगव्याचीही गरज वाटेनाशी झाली. टायरच्या चपला अंगवळणी पडल्या. स्वतःची आणि अनेकांची कटिंग मी कित्येकदा करून दिली आहे. त्यात काही वेगळेही वाटायचे नाही. सारे काही सवयीवर अवलंबून असते. आजकालचे मोबाईलवेड बघितल्यावर तेव्हाच्या जगण्याचा अचंबा वाटतो. आता सेकंदा सेकंदाला बातमी येते. तेव्हा कित्येक महिने काही कळायचे नाही. एखादी गंभीर घटना घडली तरी आमच्यापर्यंत येईस्तोवर सर्व काही "सेटल' झालेले असायचे. काही बातमी आली नाही, म्हणजे सर्व काही व्यवस्थित आहे, असा आमचा समज होता. आता परिस्थिती बदललीय. ट्रान्झिस्टर गेले. घरोघरी मोबाईल आले आहेत. जंगल प्रदेशातही डिश ऍन्टेने पोचले. हेमलकशाजवळच्या सर्व खेड्यापाड्यांत क्रिकेट आले. जंगल तुटले. गावागावात मैदाने झाली आहेत. पोराटोरांच्या मॅचेस होतात. गर्दीही होते. काळानुसार बदल होणारच. मी तरी आजवर "कॉमेन्ट्री'पलीकडे कुठे पोचलो होतो? अगदी विदेशात जाऊन आलो असलो, तरी क्रिकेट सामना बघण्याचा योग मात्र प्रथमच जुळून आला. काळाने घेतलेली झेप ओघाओघाने आठवली. कोणताही बदल आत्मसात केला पाहिजे. "ज्वाला आणि फुले'मध्ये बाबा म्हणतात ते खरे आहे. झेपावणाऱ्या पंखांना क्षितिजे नसतात. त्यांना फक्त झेपेच्या कवेत येणारे आकाश असते... उद्याच्या उड्डाणांचे आकाश पाहायचे असेल, तर नव्या पिढीने बदललेच पाहिजे. या बदलात सकारात्मकता हवी. बदलही विधायक हवेत. आपल्याला सुंदर जग हवे आहे ना; मग दुःखाचा शोध घेतला पाहिजे. स्वतः कष्ट उपसले पाहिजेत. सर्व सुंदर बदलांच्या स्वागतासाठी अधीरही झाले पाहिजे.

Monday, February 8, 2010


लव्ह अॅट र्फस्ट साइट, प्रत्येकाच्या आयुष्यात घडत नाही. प्रेम करून लग्न झालं नसेल तर, लग्नानंतर प्रेम करायला का
य हरकत आहे? अॅरेंज मॅरेज लव्ह मॅरेजमध्ये बदलणं शक्य आहे. भारतात रुजलेल्या या संस्कृतीवर आता अमेरिकन नागरिकांचाही विश्वास बसू लागलाय. ............. लग्न ठरवताना प्रत्येकाच्या बाबतीत 'लव्ह अॅट र्फस्ट साइट' असं घडेलच याची शक्यता नाही. अशा वेळी मग, पर्याय स्वीकारला जातो तो अॅरेंज मॅरेजचा. काही जणांची लव्हस्टोरी प्रेमापासून सुरू होते आणि त्याची परिणीती लग्नात होते. तर काही जणांचं लग्न आधी होतं आणि मग प्रेमाला बहर येतो. 'समव्हेअर समवन इज मेड फॉर यू' असं म्हणूनच म्हटलं जातं. पण, अशा वेळी प्रश्न पडतो तो म्हणजे 'असं ठरवून, समजून-उमजून प्रेम करता येतं?' याचं उत्तर अर्थातच 'हो' असं आहे. ठरवून लग्न करायंच. एकमेकांना समजून घेत संसाराचा गाडा हाकायचा, शक्य तेव्हा तडजोडी करायचा हा भारतीयांचा फण्डा. इन्स्टण्ट मॅरेज आणि झटपट घटस्फोटाचं लोण अलिकडेच परदेशातून आयात केलेलं. आपल्याकडे प्रेम शरीरापर्यंत मर्यादीत राहत नाही. आपला कल एकरुप होण्याकडे असतो. मन आणि आत्म्याशी याचा संबंध. कालपर्यंत बोजड वाटणारा हा विचार कुटुंबसंस्थेचे तीन तेरा वाजलेल्या अमेरिकेतही स्वीकारला जातोय. अमेरिकन सायकोलॉजिस्ट आणि लेखक रॉबर्ट एपस्टिन याच्या मते, एखाद्या व्यक्तीवर ठरवून प्रेम करता येतं आणि लवकरच हा पॅटर्न अमेरिकेत स्वीकारला जाईल, असं त्यांचं ठाम मत आहे. याचं कारण तिथे नातेसंबंधांमध्ये निर्माण झालेले प्रचंड तणाव आणि त्यामुळे अर्ध्यातच तुटणारी नाती आहे. यावर तोगडा म्हणजे कोणावर प्रेम करायचं, त्या व्यक्तीची निवड करून आपण त्या व्यक्तीवर मनापासून प्रेम करू शकतो, असं मत रॉबर्ट मांडतो. रॉबर्टच्या पहिल्या लग्नाचा शेवट घटस्फोटात झाला. ही घटना खूपच वैयक्तिक स्वरूपाची असली, तरी याचा त्याच्यावर खूपच परिणाम झाला. नात्यात आलेल्या या अपयशामुळे तो खूपच फ्रस्ट्रेट झालो होता. त्यातून टिकाऊ संबंधाबाबत त्याच्या डोक्यात चक्र सुरू झालं. आज आपल्या आजूबाजूला पाहिलं, तर घटस्फोटांचं प्रमाण वाढत असल्याचं दिसून येतंय. लव्ह मॅरेज असूनही नातं असं असफल होत असताना अॅरेंज मॅरेजची तर बातच सोडा. कारण यात दोन अनोळखी व्यक्ती दोन-चार वेळा भेटतात आणि मग, लग्नाचा निर्णय घेतात. त्यामुळे त्यांच्यात खरंच प्रेम किती असतं, हा खरा मुद्दा. लव्ह मॅरेजमध्ये ते दोघे जण एकमेकांना ओळखत असतात, एकमेकांवर प्रेम करत असतात. पण अॅरेंज मॅरेजमध्ये असं नसतं. ते दोघे फार तर चारसहा महिने एकमेकांना ओळखत असतात. पण, आपल्या मनाशी ठाम निश्चय केला, तर मात्र आपण समोरच्या व्यक्तीवर खरंच प्रेम करू शकतं, अगदी समजून-उमजून! आपण सगळेच परीकथा आणि रोमॅण्टिक सिनेमे पाहत आणि ऐकत लहानाचे मोठे होतो. या परीकथांप्रमाणे स्वप्नातला राजकुमार किंवा राजकुमारी आपल्याला भेटेल, अशी आपल्या सगळ्यांचीच कल्पना असते. या कल्पनेनुसार टीनएजपासून तारुण्यात प्रवेश करेपर्यंत आपण सगळेच आपल्याला भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये आपला जोडीदार शोधत असतो. आणि त्यापैकी काहींना त्यांचा सोलमेट भेटतो, तर अनेकांना तो कांदेपोह्यांच्या मार्गाने शोधावा लागतो. पण, मार्ग कोणताही असला, तरी एखाद्या व्यक्तीवर ठरवून प्रेम करायचं म्हटलं, तर ते निश्चितच शक्य आहे, असं रॉबर्ट सांगतो. घटस्फोटानंतर बराच काळ फ्रस्ट्रेट असणाऱ्या रॉबर्टच्या आयुष्यात कामानिमित्त आलेल्या एका तरुणीबरोबर निर्माण झालेल्या अशा नात्याच्या आधारे आपण असं मत व्यक्त केल्याचं तो सांगतो. केवळ याच प्रयोगाच्या आधारे नाही तर अॅरेंज मॅरेजेसच्या केलेल्या अभ्यासाचाही आधार याला लाभला असल्याचं तो सांगतो. ठरवून लग्न केलेल्या जोडपं प्रथम लग्नसंस्कारांनी एकत्र येतं, तर कालांतराने निर्माण झालेलं प्रेम त्यांना एकमेकांशी बांधून ठेवतं. आजही आपल्याकडे ठरवून लग्न करणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. अशा लग्नासाठी एकमेकांवर विश्वास हाच आधार असला, तरी एकमेकांवरील प्रेमच त्यांना एकमेकांसाठी अनुरूप बनवत असतं. बराच काळ एकमेकांबरोबर व्यतीत केल्यावर जसं त्या व्यक्तींमध्ये प्रेम निर्माण होतं, तसंच अॅरेंज मॅरेज केलेल्या जोडप्यांमध्येही. म्हणूनच तर कोणावर ठरवून प्रेम करायचं, म्हटलं तर ते शक्य आहे. शेअरिंग आणि केअरिंग यांच्या आधारावर हे प्रेम फुलवता येऊ शकतं, असं रॉबर्ट म्हणतो. म्हणूनच तर आपल्याकडे म्हटलं जातं, नवराबायको ही संसाररथाची दोन चाकं. दोन्ही चाकांशिवाय हा रथ पुढे हाकणार कसा?

Thursday, February 4, 2010

हमारी generation की आवाज सुनो !



स्वतःच्या हव्या तशा आयुष्याच्या मांडणीचा विचार करणारी, त्यासाठी पालकांची मदत घेणारी ही एक महाविद्यालयीन युवती... प्रातिनिधिक स्वरूपात ती पालकांना काहीतरी सांगू पाहतेय. आजच्या युवा पिढीचे भावविश्‍व शब्दबद्ध करण्याचा तिचा हा एक प्रयत्न स्वानुभवांसह, तिच्याच शब्दांत...!विद्यार्थ्यांमध्ये जेव्हा Society, Elders, Parents हे विषय निघतात, तेव्हा प्रत्येक जण त्यांच्या आई-वडिलांचा एक कॉमन व famous dialog सांगतात, "जास्त हुशारी करू नकोस. आम्ही तुझ्यापेक्षा जास्त उन्हाळे, पावसाळे बघितलेत!''पालकांना हे तरी माहीत आहे का की, त्यांच्या वेळचे उन्हाळे, पावसाळे व आताचे उन्हाळे, पावसाळे यामध्ये किती तफावत आहे? त्यांना सांगावंसं वाटतं, की तुमचा हा डायलॉग त्या काळासाठी योग्य असेल; पण आता उन्हाळे, पावसाळे तरी जागेवर राहिले आहेत का ? तुमचा उन्हाळा, पावसाळा व आमचा उन्हाळा, पावसाळा यात कम्पॅरिझन होऊच शकत नाही; कारण या दोन पिढ्यांमध्ये जो काळ आहे, त्यामध्ये झालेले changes उदाहरणार्थ © science, technology व Globalisation हे काळापेक्षाही जास्त speed ने पुढे गेले आहेत. त्यामुळे आमच्या पिढीचे विचार तुमच्याशी जुळू शकत नाहीत....म्हणे 'स्वंयपूर्ण' व्हा !मोबाईल व इंटरनेटवर नेहमीच त्यांचा राग असतो; पण आजची परिस्थिती अशी आहे, की एक वेळ जेवायला नसले तरी चालू शकते; पण या साऱ्या गोष्टी जीवनावश्‍यकच झाल्या आहेत. आम्ही मानतो, की काही जण त्याचा अतिरेक करतात, ऍडिक्‍ट होतात; पण जे त्याचा योग्य तऱ्हेने उपयोग करतात, त्यांच्यासाठी ते देवासारखे आहेत. खरं तर मोठ्यांनी आमच्याकडून या गोष्टी कशा वापरायच्या, हे शिकले तर बरे होईल. नेमकी कॉलेजला निघायची वेळ किंवा टीव्हीवर आपल्या आवडीचे काही बघत असतो, तेव्हा त्यांना दुसऱ्यांना sms करण्याची आठवण येते. स्वतःला sms करता येत नाही, याचा राग ते आमच्यावर काढतात. रूटीन कामे सांगावीत तसे, एवढा sms करून दे आणि तेही रुबाबात सांगतात. घराबाहेर गेल्यावर मोबाईलमध्ये काही अडचण निर्माण झाली, तर त्यांना दुसऱ्यांची मदत घ्यावी लागते. स्वतःचा अडाणीपणा ते दुसऱ्यासमोर दाखवतात. विशेष म्हणजे त्यांना काहीच वाटत नाही आणि आपल्याला मात्र म्हणतात, "काय थोड्या थोड्या गोष्टींमध्ये तुम्हाला मदत लागते. आता मोठे झालात. स्वयंपूर्ण व्हा! हे कितपत स्वयंपूर्ण आहेत ते त्यांनाच माहीत!'काही पालक मात्र फार मोठ्या मनाचे असतात. आपले अज्ञान जाणून घेऊन आपल्याच मुलांकडून ज्ञान update करतात. त्याबद्दल काही माध्यम वापरून सर्वांना जागे करतात. मागच्याच महिन्यात 'सकाळ'मध्ये संपादक उत्तम कांबळेंचा 'मोबाईल हरवला व मोबाईल सापडला' वाचले. आम्हा सर्वांना वाचून फार आनंद झाला. वाटलं असंच सर्व पालकांनी मुलांकडून काय शिकण्यासारखं आहे ते जगजाहीरपणे कबूल केलं, तर बाकी पालकांवर त्याचा निश्‍चितच परिणाम होऊ शकतो. आमची अशा फालतू कामांपासून सुटका होऊ शकते. लुडबूड नकोय आम्हाला...!होस्टेलवर राहणारे कसेबसे पालकांच्या तडाख्यातून सुटून दुसऱ्या गावात येतात, तेव्हाही "पालकजात' पिच्छा सोडत नाही. सतरांदा फोन करतील. "आज काय केलं बेटा?' हा तर आईचा नेहमीचा प्रश्‍न असतो. त्यामुळे त्यांना रोजचं रूटीन "त्यांना जसं आवडतं,' तसं सांगून मोकळं होतो आम्ही; कारण रात्री मित्रांशीही फोनवर गप्पा करायच्या असतात. दुसरीही काही कामे असतात त्याबद्दल यांना सांगितलं, तर आहे तिथून लुडबूड करायला कमी करत नाहीत.होस्टेलवर राहणाऱ्या मुलींचं तर विचारूच नका. ती जिथे जिथे जाते तिथे तिथे तिची आई फोनने पिच्छा करत असते. हेही कमी की काय, 'पेरेंट्‌स मीटिंग'च्या वेळी जर यांचे प्रश्‍न ऐकले की असं वाटतं, अरे, आम्हाला काय तुम्ही अजूनही school going students समजता का? आम्ही कॉलेजमध्ये आलो. मोठे झालो हे त्यांच्या डोक्‍यातच जात नाही. असे बाळबोध प्रश्‍न विचारतात, की त्यांच्या प्रश्‍नांची कीव करावीशी वाटते. 'सातच्या आत घरात' विसरा आता ! मला चांगलं आठवतं, आमच्या प्राचार्यांना एका पालकांनी प्रश्‍न केला, की सर, तुमच्या कॉलेजच्या होस्टेलवर रात्रीचे लहशलज्ञ ळप 10.30 ला आहे. म्हणजे तुम्ही रात्री 10.30 पर्यंत मुलींना भटकू देता. एवढेच नाही, तर काही मुली 10 वाजता बाहेर जातात व 10.30 ला होस्टेलवर येतात, हे योग्य आहे का? मला वाटतं अजूनही बरेचसे पालक "मुलींनी सातच्या आत घरात' या डायलॉगमधून बाहेरच निघालेले नाहीत. ते o situation चा विचार न करता प्राचार्यांसमोर मुलींवरचे प्रेम उतू घालतात. त्यांना हे कळत नाही Eng, Med. व इतर कॉलेजेस संध्याकाळी पाच ते सहापर्यंत असतात. त्यानंतर ती मुले कॉम्प्युटरचे क्‍लासेस किंवा अवघड विषयांच्या ट्यूशनला जातात. मग नऊ वाजेपर्यंत क्‍लास झाल्यावर जेवण करून रूमवर यायला 10.30 नक्कीच होणार. पुण्या-मुंबईसारख्या ठिकाणी येण्या-जाण्यामध्ये किती वेळ जातो, याचा ते विचारच करत नाहीत. मुले जर कॉलेजच्या मेसवर जेवत असतील, तर असा आव आणत प्राचार्यांना बोलतात, की तुमची जेवणाची क्वालिटी बेक्कार आहे. तुम्ही मेनूमध्ये असं ठेवायला पाहिजे, तसं ठेवायला पाहिजे. रोजच ही कुणाची तरी तक्रार असणार; कारण मेसमध्ये जेवणारी मुले सर्व states मधून आलेली असतात. त्यामुळे काहीही मेनू ठेवला तरी तो कोणाला न कोणाला आवडणार नाही आणि होस्टेलला यायच्या आधी जेवणाच्या बाबतीत यांनी आमच्यासाठी काय बोंब मारलेली असते न सांगितलेले बरे!'खोके बढाउंगा...उडाउंगा भी !'एका रविवारी आमचा ग्रुप picture नंतर मॅकडीमध्ये गेला. मनसोक्त गप्पागोष्टी रंगल्या होत्या. विषय काय असणार? सध्याचा गाजणारा म्हणजे विद्यार्थी आत्महत्या. एक जण म्हणाला, "काय यार हे काय आत्महत्येचं वारं आलंय. स्वाइन फ्लू एकाला झाला की दुसऱ्याला होतो माहीत होतं; पण सध्या तर, आज पाच आत्महत्या झाल्या, तर दुसऱ्या दिवशी त्याची संख्या 10 वर... सालं झालं तरी काय विद्यार्थ्यांना! असं वाटतं आपणही करून पाहावी की काय? पण ही करण्यासारखी गोष्ट असली तरी करून पाहण्यासाठी... अरे बापरे! या विचारानेच घाम फुटतो.''एक जण म्हणतो, "माझीही परिस्थिती अशीच आहे. सालं माझ्या जागेवर दुसरे कुणी असते, तर तो केव्हाच वर ट्रान्स्फर झाला असता. माझा बाप मोठ्ठा डॉक्‍टर त्यामुळे मी डॉक्‍टर झालोच पाहिजे, नाही तर त्यांची गादी कोण चालवणार? यार हे पेरेंट्‌स बापाने किराणा दुकान मुलाच्या ताब्यात द्यावे, अशाच प्रकारे गोष्टी करतात...''"मालूम है उसने मेरी ऍडमिशन के लिए आधा खोका दिया, लेकिन मेरे उपर के खोके में कुछ जाने को मांगता ना! तीन साल से गाडी आगेही नही जा रही, बोलता है चिंता मत कर! और आधा खोका लगाऊंगा। खुदको बहुत smart समझता है।''"अरे वो सब ठीक है लेकिन तू हमे एक बता। उपरका खोका तो हमारी समझ में आया, याने की तेरी खोपडी। लेकिन पहलेवाले ऍडमिशनवाले आधे खोके क्‍या है, हमारे भी खोपडी में डाल।''"अरे तुम सब बुद्दू हो...एक खोका याने एक करोड। करोड को ये बिझनेसवाले खोका कहते है।''"बापरे... आधा खोका याने की पच्चास लाख। तेरे बाप ने इधर भरा।''"अरे इस में कुछ बडी बात नही। उस के पास बहुत खोके पडे हुए है। और आप सबको तो पताही है, की मुझे ये डाक्‍टर लाइन बिलकूल पसंद नहीहै । मैं इंजिनिअर होना मांगता था लेकिन...'' "उसे मालूम नही जब मैं उनकी गद्दी पे बैठूंगा तो खोके बढाऊंगा लेकिन जीते-जागते खोके उडाउंगा।''म्हटलं, आम्हालाही पडतात प्रश्‍न !मी नाशिकची... आई-वडील शिक्षण क्षेत्रात असल्याने लहानपणापासून अकरावी-बारावीचे स्टुडंट्‌स बघते. पालक बघते. आता हे सर्व वरचं ऐकलं तेव्हा माझ्या डोळ्यासमोर उभ्या राहिल्या एक डॉक्‍टर मॅडम. एकदा त्या आमच्याकडे आल्या. माझ्या पप्पांना म्हणाल्या, "सर, दोन महिन्यांवर परीक्षा आली आहे. माझी सोनाली बारावीत आहे. तिला जरा केमेस्ट्रीची मदत कराल काय?''दुसऱ्या दिवसापासून सोनाली संध्याकाळी सात ते रात्री नऊ आमच्याकडे. मॅडम स्वतः तिच्यासोबत यायच्या. खाली दोन तास गाडीत बसून राहायच्या. तिला सोबत घरी घेऊन जायच्या. प्रॅक्‍टिस सोडून दोन महिने दवाखाना बंद ठेवला. आईचं मुलीविषयीचं स्वप्न पूर्ण झालं. सोनाली मेडिकलला गेली. मोठा मुलगाही डॉक्‍टर झाला. त्यामुळे आई खूश; पण वडिलांना वाटायचं लहान्याने माझ्यासारखं डॉक्‍टर व्हावं. लहाना पठ्ठा फार हुशार निघाला! बारावीचा रिझल्ट लागेपर्यंत कळूच दिलं नाही, की त्याने अकरावीतच इळे. सोडलं आहे. रिझल्टनंतर आई-वडिलांना धक्काच. त्यानं ठरवलं होतं की डॉक्‍टर व्हायचं नाही. आई-वडील रिझल्टनंतर थोडा वेळ नाराज झाले. सर्व विसरून त्याच्या इंजिनिअरिंगच्या ऍडमिशनच्या मागे लागले. चांगल्या ठिकाणी ऍडमिशन झाली. मागच्याच महिन्यात त्याच्या लग्नाच्या रिसेप्शनला पुण्याला मम्मीबरोबर गेले तेव्हा कळलं, की मोठा मुलगा नाशिकमध्ये व सोनाली व छोटा मुलगा मोठ्या पोस्टवर फॉरेनमध्ये... भूतकाळात गेले... सोनालीला आईने त्या वेळी साथ दिली नसती तर... छोट्यावरचा राग लगेच विसरून पालक त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले नसते तर... स्वतःची प्रॅक्‍टिस काही महिने बंद ठेवली नसती तर... हे असे अनेक प्रश्‍न...'असे आई-वडील आम्हालाही असते तर...? 'आधी दिलेल्या उदाहरणात त्या आई-वडिलांसारखं पैशाच्या जोरावर मुलाला डॉक्‍टर बनवणं व आपलं करिअर थोडं बाजूला ठेवून मुलांना मानसिकरीत्या सांभाळून प्रोत्साहन देणारे आई-वडील दोघांच्या ऍटिट्यूडमध्ये फार मोठी तफावत. पहिल्या उदाहरणात बनलेले डॉक्‍टर समाजाला घातक, तर दुसऱ्या उदाहरणात बनलेले डॉक्‍टर समाजाला आवश्‍यक.डॉ. उमेश कुलकर्णी व शर्मिला कुलकर्णी... पप्पांना मणक्‍यांचा त्रास म्हणून नेहमी त्यांच्याबरोबर भेट व्हायची... एकदा सहज विचारलं, ""डॉक्‍टरसाहेब, मॅडम दिसत नाहीत?''ते म्हणाले, ""आमच्या मुलीला खेळाची आवड. त्यामुळे ज्या वेळी बाहेरगावी तिच्या टूर्नामेंट्‌स असतात, तेव्हा आळीपाळीने आमच्यापैकी एक जण तिच्याबरोबर जातो...'' विश्‍वासच बसला नाही.12 जानेवारीला "सकाळ'चे संपादक उत्तम कांबळे यांनी "तुमच्याही मुलांच्या मनात आहे एक कविता,' हे शीर्षक असणारी न्यूज फ्रंट पेजवर छापली. सकाळी सहाला मम्मीचा मोबाईल वाजला. दुसरीकडून अनोळखी व्यक्ती माझ्या आईला congratulation देत होत्या. आईला व मला कळलं, की आमच्या कुटुंबावर फ्रंट पेजवर बातमी आहे. तीन ते चार दिवस मम्मीचा मोबाईल फुल एंगेज. एक कॉल सुरू असताना पाच-सहा कॉल्स वेटिंगवर... मला कळेना एवढे फोन कसे येताहेत? तेव्हा लक्षात आलं न्यूजमध्ये मम्मी-पप्पांचे मोबाईल नंबर दिले आहेत. न्यूज येईपर्यंत आम्हा कोणालाच वाटले नव्हते, की आम्ही काही वेगळं केलं आहे. परंतु जेव्हा एसएमएस वाचायला सुरवात केली, तेव्हा प्रत्येक मेसेजमध्ये मम्मी-पप्पांना
congratulation त्याचबरोबर माझ्यासाठी खूप सारे good wishes. मी मम्मीला विचारले, "हे काय?'तेव्हा मम्मी म्हणाली, "बेटा, मला जे फोन आले त्यामध्ये जे स्टुडंट होते त्याचं म्हणणं होतं, "मॅडम, आम्हालाही असे आई-वडील असते तर... किंवा मॅडम please माझ्या आईशी... माझ्या वडिलांशी बोलाल का?' अशा प्रकारच्या फोननी तर माझ्या आईची झोपच उडाली. लक्षात आलं, की कित्येक आई-वडील मुलांना समजून घेत नाहीत... नको तेवढी बंधनं टाकतात... आम्ही हे स्वप्न पूर्ण करू शकलो नाही, आता तू तरी पूर्ण कर... म्हणजे स्वतःचे स्वप्न मुलांकडून पूर्ण होण्याची अपेक्षा करतात... काही म्हणाले, "मॅडम, मला संगीताची आवड आहे, तर कुणाला ड्रॉइंगची, तर कुणाला खेळण्याची...' पण बहुतेक पालकांचं एकच म्हणणं, "पहिलं अभ्यासात लक्ष घाल. पूर्ण आयुष्य पडलं आहे छंद जोपासायला; पण माझ्या मम्मीला वाटतं शिक्षणाबरोबर जर छंद जोपासू दिले तर stress level कमी होऊ शकते; पण हे पालकांना पटविणे म्हणजे मांजरीच्या गळ्यात घंटा बांधणे असे आहे. यामुळे माझ्या पेरेंट्‌सनी सर्वांच्या फोनला प्रतिसाद दिला. "तुमच्या मुलांच्या पाठीशी उभे राहा,' असे सांगितले. तुम्ही केलेल्या संस्कारांवर तरी ठेवा विश्‍वास !सध्या पेपर उघडला की हमखास विद्यार्थ्यांच्या आत्महत्येवर बातमी असते. विद्यार्थ्यांची stress level वाढली हे खरं आहे; पण त्यांना त्यांच्याच घरात समजून घेणाऱ्या प्रेमाच्या व्यक्ती लाभल्या तर...? ते frustration adiction च्या मागे लागतात. वाईट सवयी लावून घेतात व जिथे या गोष्टी म्हणजे stress level अतिशय वाढते, तेव्हा आयुष्याचा शेवट एवढाच पर्याय त्यांना दिसतो. नेहमी "फोनवर एवढा वेळ बोलते', असं मम्मीला म्हणणारी मी या घटनेनंतर तिचं बोलणं किती गरजेचं आहे हे माझ्या लक्षात आलं. अशा कित्येक आया आहेत त्या योग्य वेळी स्वतःच्या मुलांचं करिअर स्वतःच्या करिअरपेक्षा आवश्‍यक समजतात.
मला शाळेचे दिवस आठवतात. सातवी-आठवीमध्ये मुली आल्या, की पेरेंट्‌सला वेगळीच काळजी असते. नको तेवढ्या चौकशा... थोडासा उशीर झाला तरी शंभर प्रश्‍न, "आता तू मोठी झालीस. असं नको करू. तसं नको करू. असे कपडे घाल, तसे कपडे घाल, घरात कामाला मदत कर, मुलीची जात आहे. तुला स्वयंपाक यायलाच पाहिजे...' आणि रिस्ट्रिक्‍शन्स..माझ्या एका मैत्रिणीची आई मुलीवर सतत ऑर्डर सोडते. तिला एखादी गोष्ट करणे शक्‍य नसेल, तर कुठलाही प्रश्‍न विचारण्याचा तिला अधिकार नाही. आम्ही मैत्रिणीला एकदा विचारले, "का गं, आम्ही सर्व सायकलीवरून येतो, तू का नाही सायकलीवरून येत?' ती म्हणाली, "माझे आई-बाबा म्हणतात, सायकल चालवायची नाही; कारण त्याने उंची वाढते व उंची जर जास्त वाढली, तर तुझ्यासाठी मुलगा कुठून आणायचा?'शक्‍यतोवर आम्ही रात्री 10.30 ते 11.30 लॅपटॉपवर बसतो. इंटरनेटवर बसतो; कारण त्याच वेळी मित्र-मैत्रिणी भेटू शकतात. काही जण याचा गैरवापर करतात म्हणून प्रत्येकच जण गैरवापर करेल असे नाही. कधी कधी इनबॉक्‍स चेक करतात. त्यावरचे जे रिप्लाय असतात, त्याचा खरा मीनिंगच त्यांना माहीत नसतो किंवा तो कुठल्या मेसेजवर रिप्लाय आहे हेही माहीत नसतं. उगीचच निगेटिव्ह मीनिंग काढतात. आम्ही जास्त एसएमएस करतो; कारण ते आम्हाला स्वस्त वाटतात. उदाहरणार्थ मैत्रिणीला विचारायचं आहे "तू कुठं आहेस?' असे करण्यासाठी कॉलला एक रुपया; पण एसएमएसला एक पैसाच लागतो. त्यामुळे आम्ही एसएमएसचा भरपूर वापर करतो. तर यांना वाटतं काही तरी लफडंच आहे ! यांचा थोड्या थोड्या गोष्टींवर अविश्‍वास.शेवटी म्हणावं लागतं, ""अरे बाबा... तुम्हीच तर आमच्यावर संस्कार केले आहेत, त्यावरही तुमचा विश्‍वास नाही का?''बऱ्याच ठिकाणी अशी परिस्थिती आहे, की आई-वडील मुलांशी नीट वागत नाहीत. त्यामुळे त्यांच्यामध्ये गुड रिलेशनशिप तयार होत नाही. अशा वेळी मुलं आपलं मन मोकळं करू शकत नाहीत. जर त्यांचे मित्रही असे असतील, की त्यांच्याजवळ ते बोलू शकत नाहीत. त्या वेळी असं वाटतं, की भावना मोकळ्या करायला आई एवढं जवळ कोणीच असू शकत नाही. ज्यांना घरातच भावनिक संरक्षण मिळतं, ते वाईट मार्गाला लागत नाहीत....बाप म्हणून त्यांचा काय उपयोग? माझी मैत्रीण जी आदर स्टेटची आहे, ती एक दिवस चक्कर येऊन पडली. स्ट्रेसमुळे. दुसऱ्या स्टेटची असल्यामुळे आई-वडील लगेचच पोचू शकत नव्हते. माझ्या आईने तिला दवाखान्यात नेऊन दिवसभर भरती केले. रात्री घरी आणले.ती मैत्रीण डॉक्‍टरांना म्हणायची, "मुझे पप्पा से बात करनी है।' परंतु तिचे वडील ऑपरेशनमध्ये एंगेज असल्यामुळे बोलू शकत नव्हते. रात्री फोन केला त्यांना. सर्व घटना सांगितली. मी त्यांना विचारले, "अंकल, आप कब निकल रहे हो?' तेव्हा ते म्हणाले, "मुझे तीन-चार दिन मेजर ऑपरेशन्स है इसलिए नही आ सकता। ऐसा करो उसे बोलो दो दिन रेस्ट कर के प्लेन से चली आना।' मी तिच्या बाजूलाच बसले होते. माझं डोकं सुन्न झालं. तिच्या पप्पांना बाकी पेशंटसमोर स्वतःची मुलगी काहीच वाटत नसेल. कदाचित बाकी पेशंटचे ऑपरेशन दुसरे डॉक्‍टर करू शकतील; पण पप्पा म्हणून जर ते आले असते... नात्यातल्या दुसऱ्या कुणाला पाठवू शकले असते... असे डॉक्‍टर खोऱ्यांनी पैसे कमावतात; पण बाप म्हणून त्यांचा काय उपयोग? कदाचित पप्पांमुळेच ती परमनंट पेशंट बनेल.

अश्‍विनी जोगी, नाशिक

Tuesday, February 2, 2010

संपलेली माणुसकी
सौ. स्वाती संजय पोरवाल, बिबवेवाडी

त्या दिवशी रविवार होता. बऱ्याच दिवसांत हॉटेलात
जेवायला गेलो नव्हतो. माझी मुलगी म्हणाली, ""आज हॉटेलात जायचे.'' ती शक्‍यतो कधी बाहेर जेवायचे म्हणत नसल्याने माझ्या मिस्टरांनी लगेच होकार दिला. आम्ही तिघे एका प्रशस्त हॉटेलात गेलो. रविवार असल्याने बरीच गर्दी होती. बरेच लोक वेटिंगला होते. (कुठल्या प्रवासी तिकिटाला नव्हे हॉटेलमध्ये जेवायला) असो. कसेबसे आम्हाला एक टेबल मिळाले. आम्ही ऑर्डर दिली. जेवण येईपर्यंत सहजच इकडेतिकडे बघत होतो. समोरच्या टेबलावर 6-7 जणांचे कुटुंब बसले होते. सर्व हसतखेळत ताव मारत होते. त्याच बाजूला एक घोड्याटाइप खेळणे (गेम) होते. त्यावर एक वर्ष ते दीड वर्षांच्या लहान मुलाला घेऊन एक 10-12 वर्षांची मुलगी उभी होती. ते मूल छानपैकी घोड्यावर हलत होते, हसत होते. पण... त्या मुलीची नजर मात्र टेबलावर मांडलेल्या जेवणावर होती. तिच्या चेहऱ्यावरून तिला भूक लागल्याचे जाणवत होते. ती मुलाला घेऊन त्या कुटुंबाच्या टेबलाजवळ आली, तर ते मूल परत घोड्यावर जाण्यासाठी रडायला लागते. टेबलावरच्या एका स्त्रीने तिला हाताने तिकडे जाण्यास सुचवले. ती परत निराशेने वळली. आताही तिची नजर सर्व टेबलावर मांडलेल्या अन्नावर होती.आता आमचीही ऑर्डर आली होती. पण माझे काही जेवणात लक्ष लागेना. पती व मुलगी आनंदाने जेवत होते. माझ्या घशाखाली काही केल्या घास उतरेना. हे म्हणाले, "काय झाले? सारखे समोर काय पाहते आहे?'' मी त्यांना ती मुलगी व ते कुटुंब दाखवले. ते म्हणाले, ""जाऊ दे. त्याचं झाल्यावर तिला जेवायला देतील.'' पण माझे काही लक्ष लागेना. एव्हाना त्यांची जेवणं आटोपली होती व कुटुंबप्रमुखाने खुणेनेच वेटरला बिल देण्याची सूचना केली. मला कळून चुकले की त्या मुलीला इथे तरी जेवण मिळणे नाही. मला माहीत होतं, की जरी माझ्या मिस्टरांच्या मनात त्या मुलीला खायला घालायचे असले तरी ते भांडण नको म्हणून घालणार नाहीत. ते हात धुवायला गेले. एवढ्यात मी वेटरला पाहिले. त्याला बोलावले व त्या मुलीला पाव-भाजी व बरोबर दोन जोडी जास्त देण्यास सांगितले. वेटरजवळ 50 रु. दिले. तोपर्यंत ते लोक निघण्याच्या तयारीत होते. मी त्याच्या टेबलाजवळ जाऊन त्या स्त्रीला म्हणाले, ""माझा आज संकल्प होता, एखाद्या 10-12 वर्षांच्या मुलीला जेवायला घालायचे, पण दिवसभरात कोणीही भेटले नाही म्हणून तुमच्या कामवाल्या मुलीसाठी पावभाजी ऑर्डर केली आहे, ती खाईपर्यंत थांबा.'' त्या बाईने एकंदर प्रकार लक्षात घेता माझ्यावर जळजळीत कटाक्ष टाकला. मी तिच्याकडे न बघता त्या मुलीला खुणेने बोलावून तिला बसायला सांगितले व वेटरला परत ती मुलगी दाखवून लवकर आणण्यास सांगितले. तेवढ्यात माझे पती आले, मी काढतापाय घेतला. नंतर काय झाले माहीत नाही. बाहेर आल्यावर जेव्हा मी त्यांना ही गोष्ट सांगितली तेव्हा ते म्हणाले, ""पावभाजी का? तिला एक भाजी व 2-3 पराठे द्यायचे होतेस ना? ती तरी हे कधी खाणार? मी पैसे दिले असते.''दुसरा प्रसंग माझ्या मैत्रिणीच्या घरी तिच्या मुलाची बर्थडे पार्टी होती. मुले एन्जॉय करत होती. इडली, सांबार, बर्फी, केक, चॉकलेट, पलीकडे एक डिश धुण्यासाठी बाई बसली होती. तिच्याबरोबर एक 5-6 वर्षांचा मुलगा होता. तो केविलवाण्या नजरेने हे सर्व पाहत होता. मी मैत्रिणीला म्हणाले, ""त्याला खायला दे ना.'' ती म्हणाली, ""अगं सगळं झाल्यावर देईन. नाही तरी मुलं खूप उष्टं टाकतात.'' हे ऐकून माझ्या अंगावर काटा आला. आपल्या मुलाचं आपण किती कौतुक करतो. पाहिजे ती वस्तू त्याला आणून देतो. मग आपल्याकडे काम करणाऱ्या लहान बछड्यांचे असे हाल? मोठं माणूस असेल तर आपले मन मारू शकते, पण लहान मुलांना थोडी कळतं की आपण नोकर आहोत. आपल्याला असलं काही मिळणार नाही. मला वाटलं होतं एक डिश घ्यावी व त्या मुलाला द्यावी, पण मैत्रिणीचा स्वभाव पाहता हिंमत झाली नाही. आता वाटतं माझी डिश मी त्याला देऊन त्या मैत्रिणीलाही झाडायला हवं होतं, उष्टं देणं किती पाप. गरिबी हा त्यांचा गुन्हा आहे का? देवानेही अशा लोकांना जन्माची अद्दल घडवायला हवी.सर्व नोकर ठेवणाऱ्या लोकांना माझी कळकळीची विनंती, की कमीत कमी लहान मुलाचे मन मारू नका. आपल्या मुलासारखं त्यांना वागवा, मग बघा त्याच्या आयाही किती प्रामाणिकपणे काम करतील आणि तुमचे मनाचे समाधान? ते तर तुम्ही कशातही मोजू शकणार नाही, माणुसकीचा अंत करू नका.

Sunday, January 24, 2010

घरोघरी नाहीत आता मातीच्या चुली!
पायाच्या दोन्ही अंगठ्यांत काठवट धरून भाकरी बडवायची. सुना उभ्या राहून परातीत भाकरी थापायला लागल्या. आईची टराटर फुगलेली भाकरी आणि सुनांचा पिठाचा भाजलेला लगदा. कशाची तुलना कशाशी करायची? आता घरात किचनकट्टा. शेगडी-लायटर. सगळं चकाचक. किचन कसं टीव्हीतल्या जाहिरातीगत दिसतं. ओव्हनपासून ते मायक्रोव्हेवपर्यंत सारं हाजीर! मिक्‍सरपासून ग्राइंडरपर्यंत सारं तैनात! फक्त चवीचा पत्ता नाही. कुठं हरवली ही चव? चुलीसमोर माझं बालपण गेलं. फुलती चूल... भुरभुरती चूल... भडकलेली चूल... थंड चूल... चुलीची अनेक रूपं पाहिली मी. माझ्या नकळत्या वयात. चूल आणि मूल. माझी आई या चुलीसोबत, माझ्यासोबत जगत होती. जगवत होती. चुलीसोबत पेटणं, धगधगणं, फुलणं, थंड होणं अनुभवलं मी माझ्या वयासोबत. आयुष्याशी जोडली गेली चूल, भानूशी आणि वैल. नाही कळत ना तुम्हाला? नकोच कळायला! काय असते चूल? तीन दगडांची चूल. कुणाचं पेटतं आयुष्य? कशी शोधली असेल माणसानं चूल? झाडावर झाड घासलं. उठली असेल ठिणगी. पेटला असेल वणवा. दावानल! जंगलभर, पोळले असतील पक्षी, प्राणी, पशू. माणसानं वाचवलं असेल आपल्याला. चलाखच तो. मेंदू होता त्याच्याजवळ. भाजलेला पशू-पक्षी-प्राणी-फळ-झाड चाखले असेल त्यानं. हे फारच ग्रेट! जीभ आणि चव. काही तरी वेगळं लागलं असेल माणसाला. मग विस्तवाचा शोध. यातायात. झाडावर झाड आपटा. दगडावर दगड. दिसली असेल ठिणगी. ती पकडा. ती साठवा. साठवता साठवता चुलीचा शोध. आधी फक्त मोकळी- धग. नंतर तीन दगडांची. मग कोणी तर कल्पक कुंभारानं बनवली असेल चूल. फारच बुद्धिमान असेल कुंभार. पेटणारी आग नियंत्रित करणारा. आगीला आकारात बंद करून इप्सिताजवळ पोचवणारा. त्यानंच बनवलं मडकं. मातीला आकार देऊन. पहिलं मडकं घडवणारा कुंभार नोबेल लॉरेटच! त्याला नाही दिलं कुणी नोबेल. बिचारा हाकलला गेला व्यवस्थेतून. ओबीसी हे आरक्षण देऊन! चूल : जणू काही घराची लक्ष्मीच!आई भल्या पहाटे उठून चुलीला पोतेरं द्यायची. हळद-कुंकू लावायची. चुलीत जिवंत ठेवलेला विस्तव फुलवत ठेवायची. शेणीवर. नव्हती तेव्हा काडेपेटी. विस्तव राखेत पेरून ठेवायचा. गरज असेल तेव्हा फुलवायचा. निर्माण करायची आग. जेव्हा चूल थंड पडायची तेव्हा आणायचा शेजाऱ्याच्या चुलीतून विस्तव. हक्कच तो! नव्हतं उसनं-पासनं. कैकदा असा विस्तव आणला आहे मी ही शेळकुंडावरून किंवा वडील आपल्या तंबाखूच्या पिशवीतून दोन गारगोट्या काढायचे. एकमेकांवर आपटून चकमक पेटवायचे. कप असायचा मध्ये. कप म्हणजे कापसाचं कवच. त्यावर फुलायचा विस्तव. पेटायची चूल. नंतर आली आगपेटी. गंधक सापडल्यावर. चुलीनं समृद्ध केलं आयुष्य. चुलीवरच्या गाडग्यातली आमटी. चुलीवरची भाकरी. चुलीवर तापवलेल्या दुधाची साय. वैलावर ठेवलेली भाजी. साऱ्यालाच मातीचा, राखेचा गंध. जिभेवर रेंगाळावी अशी चव. आईच्या हातातून चूल चव कमवायची. भाकरीला पापुद्रा यायचा. चूल लक्ष्मी घराची. आई भडकली, की चुलीशी बोलायची. चूल फुलली, तवा फुलला, की आई हेरायची... भांडण होणार. तव्यातली पहिली इटुकली भाकरी, आमटीचा पहिला थेंब, चहाचा पहिला घोट चुलीचा असायचा. चुलीला दिल्याशिवाय काहीच असायचं नाही आमच्या पदरात. चूल आणि आई दोघीही अन्नदात्या. दोघीत कमी-जास्त कोणीच नाही. जुना काळ आठवणं हा गुन्हाच!काळ बदलला. आई आणि चूल यांच्याबरोबर आम्ही वाढत गेलो. आईच्या घरात सुना आल्या. चूल, भानुशी, वैल, खोपडा, जळण, बाजूला सारलं जाऊन गॅस, शेगडी, लायटर आला. आई पायाच्या दोन्ही अंगठ्यांत काठवट धरून भाकरी बडवायची. सुना उभ्या राहून परातीत भाकरी थापायला लागल्या. आईची टराटर फुगलेली भाकरी आणि सुनांचा पिठाचा भाजलेला लगदा. कशाची तुलना कशाशी करायची? काठवट पायांच्या अंगठ्यात धरून आईची पाच-सहा बाळंतपणं सहज झाली. सुनांचं प्रत्येक वेळी सिझर. डॉक्‍टरांना जगवायला शेगडीचा जन्म.घरात किचनकट्टा. शेगडी-लायटर. सगळं चकाचक. किचन कसं टीव्हीतल्या जाहिरातीगत दिसतं. ओव्हनपासून ते मायक्रोव्हेवपर्यंत सारं हाजीर! मिक्‍सरपासून ग्राइंडरपर्यंत सारं तैनात! फक्त चवीचा पत्ता नाही. कुठं हरवली ही चव? हे फारच नॉस्टॅल्जिक झालंय ना? खरंय. आठवणं हा गुन्हाच. उलट येणाऱ्या काळावर स्वार होता आलं पाहिजे; पण कसं व्हायचं स्वार? वेगवेगळ्या जाहिरातींतल्या नवनव्या वस्तूंना घरात मोकाट प्रवेश देऊन? भरपूर लाकडं असायची शेतात. उन्हाळ्यात तोडायची, वाळवायची. पावसाळा निवांत. ददातच नसायची. झाड तोडायचा प्रश्‍न नसायचा. फक्त बेनायचं. पुन्हा झाड बेभान. जळाऊ लाकडंच लाकडं. भणभणती चूल. धुरात जीव घुटमळतो म्हणून आला वातीचा स्टोव्ह. मग रॉकेलचा प्रेशर स्टोव्ह. शेगडी ते गॅस. प्रगती हवीहवीच असणारी. मग प्रगतीचं शिखर मायक्रोव्हेव. अजून काहीही येईल. हवेतच शिजेल अन्न. चांगलंच आहे असं झालं तर! जगणं सुलभ, संपन्न होतच जायला हवं. प्रश्‍न इतकाच- शेतातली लाकडं, घरातली लाकडं, शिजवत जायचे लोक अन्न. तवा-चूल-भानुशी-वैल-राख साऱ्यांचंच रक्त जोडलं जायचं भाकरीशी. रॉकेल आलं. स्टोव्ह आला. बघता बघता गॅस आला. शेगडी आली. मायक्रोव्हेव आणि बाकी बरंच काही. प्रगती म्हणून भन्नाटच; पण कुठं? जिथं झाडं नाहीत, इंधन नाही तिथं सारं ठीक. त्यांनी गॅस पेटवावा. त्याची गरजच असते की; पण जिथं ही इंधनाची मुबलकता तिथं हा गॅस, ही शेगडी काय कामाची? कोणी म्हणेल वेळ वाचतो, श्रम वाचतात. अमूक होते-तमूक होतं. त्याचं काय? असेल बरोबर त्यांचं; पण उद्या संपेलच कधी तरी गॅस. रॉकेल आणि तुम्ही शोधलेले बरेच काही. विजेपासून अणूपर्यंत. तेव्हा पुन्हा माघारी वळण्यापेक्षा आत्ताच चूल जपायला काय हरकत आहे. आरोग्य तरी निरोगी राहील. चव शाबूत राहील. ऊर्जा टिकेल. गॅस खूप लोकांना पुरवून वापरता येईल. कोपऱ्यात पडलेली चूल यासाठी तरी शोधायला हवी. आपण कितीही मागास ठरलो तरी...!

Monday, January 18, 2010

- सुमन कल्याणपूर, नामवंत गायिका
सुमन म्हणजे फूल. सुमन कल्याणपूर या असामान्य गायिकेने गायलेली बहुतेक हिंदी-मराठी गाणी आजही तितकीच टवटवीत वाटतात. त्यांनी पार्श्वगायन सोडल्याला अनेक वर्षं उलटली तरी त्यांचे नाव व गाणे रसिकांच्या मनात तसेच ताजे आहे. महाराष्ट्र सरकारने नुकताच त्यांना 'लता मंगेशकर पुरस्कार' जाहीर केला आहे. त्या निमित्ताने. ........... दिवाकर देशपांडे सुमन कल्याणपूर यांना हिंदी सिनेमांची खूप कमी गाणी गायला मिळाली याची त्यांच्या बऱ्याच चाहत्यांना खंत आहे. खरं तर तशी खंत बाळगायचं काहीच कारण नाही. सुमन कल्याणपूर यांच्या समकालीन गायक-गायिकांनी त्यांच्यापेक्षा कितीतरी अधिक व सातत्याने गाणी गायली असली तरी त्यांच्या व सुमन कल्याणपूर यांच्या गाजलेल्या व रसिकांच्या आजही लक्षात राहिलेल्या गाण्यांचे प्रमाण काढले तर समकालीन गायक-गायिकांपेक्षा सुमन कल्याणपूर यांच्या अशा गाण्यांचे प्रमाण कितीतरी अधिक आहे. आकडेवारीतच बोलायचे झाले तर सुमन कल्याणपूर यांच्या समकालीन गायक-गायिकांच्या गाजलेल्या व लोकांच्या लक्षात राहिलेल्या गाण्यांचे प्रमाण २५ टक्के धरले तर सुमन कल्याणपूर यांच्या अशा गाण्यांचे प्रमाण ९० टक्क्यांपेक्षाही अधिक भरते. गाजलेल्या गाण्यांपेक्षा त्यांची न गाजलेली गाणी शोधणे अधिक अवघड आहे. त्यामुळे हिंदी पार्श्वगायन क्षेत्रातील सर्वाधिक यशस्वी गायिका कोण? या प्रश्ानचे एकमेव उत्तर सुमन कल्याणपूर असे आहे. याचा अर्थ लता मंगेशकर किंवा आशा भोसले या अयशस्वी गायिका आहेत, असा कुणी काढत असेल तर मात्र ते सपशेल चूक आहे. त्यांना यश आणि अपयशाची मोजपट्टीच लावता येत नाही. त्यामुळे या दोन्ही गायिकांना वगळून हिंदी चित्रपटांतील पार्श्वगायकांच्या कारकिदीर्चा आढावा घ्यायचा असेल तर सुमन कल्याणपूर या एकमेव यशस्वी गायिका ठरतात! खरं तर सुमन कल्याणपूर यांचा आवाज लता मंगेशकर यांच्याच जातकुळीचा, पण तरीही पूर्ण वेगळा. या दोन्ही आवाजांमधला फरक तसेच गायनाच्या पद्धतीतला फरक ज्यांचे कान तयार आहेत; अशा फार थोड्या लोकांच्या लक्षात येतो. त्यामुळे हिंदी, मराठीतले लता मंगेशकरांचा आवाज वापरणारे बरेच संगीतकार काही विशिष्ट गाणी सुमन कल्याणपूर यांच्याकडूनच गाऊन घ्यायचे. उदाहरणच द्यायचे झाले तर 'हाले दिल उनको सुनाना था' हे 'फरियाद'मधलं ज्येष्ठ संगीतकार (कै.) स्नेहल भाटकर यांनी संगीत दिलेलं गाणं फक्त सुमन कल्याणपूर यांच्याच आवाजात फिट बसतं. तसंच 'मेरे महबूब न जा, आजकी रात न जा' हे 'नूरमहल'मधलं जानी बाबू कव्वाल यांनी संगीतबद्ध केलेलं गाणं इतर कोणत्याही आवाजात ऐकण्याची कल्पनाच करवत नाही. त्यांच्या आवाजातलं, गायकीतलं खास असं वेगळेपण अशा अनेक गाण्यांमधून रसिकांना दिसत राहतं. लता मंगेशकर यांचा आवाज वापरणं ही हिंदी चित्रपटसृष्टीची न टाळता येणारी अपरिहार्यता होती, तसं सुमन कल्याणपूर यांच्याबाबत नव्हतं, कारण त्यांचा आवाज ही संगीतकारांची कमजोरी होती. अमुक एका गाण्याला सुमन कल्याणपूर यांचाच आवाज न्याय देऊ शकेल असं संगीतकारांना वाटलं की, ते या अटळतेला बाजूला ठेवून सुमन कल्याणपूर यांच्याकडूनच ते गाणे गाऊन घेत. 'आजकल तेरे-मेरे प्यार के चचेर् हर जुबानपर' हे 'ब्रह्माचारी' चित्रपटातलं गाणं तसं 'चालू टाईप'चं गाणं. ते लता मंगेशकरांनी गायलं असतं तर नक्कीच लोकप्रिय झालं असतं, पण सुमन कल्याणपूर यांच्या आवाजानं मुमताजचा नखरा अगदी अचूक पकडला आहे. त्यामुळे ते आजही रसिकांच्या चांगलंच लक्षात आहे. मराठीत तर अनेक संगीतकारांनी सुमन कल्याणपूर हा आपला ब्रँडच बनवला होता. दशरथ पुजारी, अशोक पत्की, कमलाकर भागवत अशा गुणी संगीतकारांनी सुमन कल्याणपूर यांनाच डोळ्यासमोर ठेवून गाणी बांधली आणि त्यांनी ती गाणी अक्षरश: अजरामर केली. अशा गाण्यांची कितीतरी उदाहरणं सांगता येतील. सुमन कल्याणपूर यांच्यावर अन्याय झाला असे बरेच लोक म्हणतात खरे; पण कमी गाणी गायला मिळाली म्हणून अन्याय झाला असं म्हणण्यापेक्षा जास्ती जास्त चांगली गाणी गायला मिळाल्यामुळे पार्श्वगायनाच्या क्षेत्रात खरा न्याय सुमन कल्याणपूर यांनाच मिळाला, असं वाटतं. जे काही मिळालं ते निखळ होतं आणि या अव्वल गायिकेनं त्या गाण्यांचं सोनंच केलं. शेकडो गाणी गात राहून अनेकांमधला एक कलाकार होण्यापेक्षा मोजकी पण नेमकी लक्षात राहणारी गाणी गाऊन त्यांनी स्वत:चं हिंदी, मराठी पार्श्वगायनाच्या क्षेत्रात आगळं स्थान निर्माण केलं आहे. त्यांनी गायलेल्या इतर भाषांमधल्या गाण्यांमुळे त्यांचं त्या त्या प्रादेशिक भाषांमध्येही असंच स्थान असणार, यात शंका नाही. सुमन कल्याणपूर यांचीही भावना आपल्यावर अन्याय झाला, आपण हिंदी संगीत क्षेत्राच्या राजकारणाचे बळी आहोत, अशी असल्याचे काही ठिकाणी वाचायला मिळते. ते कितपत खरे आहे माहीत नाही. पण 'सुमन कल्याणपूर' या नावाने भारतातील पार्श्वगायनाच्या इतिहासात एक न पुसले जाणारे प्रकरण ठळकपणे लिहिले गेले आहे आणि जोपर्यंत हिंदी, मराठी गाणी ऐकणारे रसिक या भूतलावर आहेत, तोपर्यंत हे नाव आणि त्यांची गाणी लोकांच्या ओठांवर राहणारच आहेत.